Home / महाराष्ट्र / Maharashtra Rain : मुंबईला आज हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’; जुन्नर परिसरात ढगफुटीसदृश पावसाने नदी-नाल्यांना पूर-संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार, पाहा सविस्तर अपडेट..

Maharashtra Rain : मुंबईला आज हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’; जुन्नर परिसरात ढगफुटीसदृश पावसाने नदी-नाल्यांना पूर-संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार, पाहा सविस्तर अपडेट..

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अखेर भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची घोषणा केली...

By: Team Navakal
Maharashtra Rain 
Social + WhatsApp CTA

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अखेर भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची घोषणा केली आहे. मान्सूनच्या प्रगतीची वाटचाल कायम असून, त्याने रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत धडक मारली आहे. काल मुंबईसह तिच्या उपनगरांमध्ये पावसाच्या सरींनी हजेरी लावली. आज देखील मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांसाठी मुंबईत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. आगामी २४ ते २७ जून या कालावधीत कोकण किनारपट्टीसह राज्यातील अंतर्गत भागांमध्ये मान्सूनचा जोर अधिक वाढण्यासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे.

दीर्घकाळापासून मोसमी पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या पुणे जिल्ह्यात काल वादळी पावसाने रौद्ररूप धारण केले. जुन्नर तालुक्यातील कुमशेत आणि परिसरात ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाला. या तुफानी पावसामुळे स्थानिक रस्ते, ओढे आणि लहान नाल्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. अचानक आलेल्या या पुरामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, शेतीसह स्थानिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर: वैजापूर येथे पूर, महामार्गावरील पूल वाहून गेला
वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात काल सुमारे दोन तास सलग कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक गळमोडी नदीला पूर आला. सध्या या भागात नांदगाव-शिऊर महामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी वाहतुकीला पर्यायी मार्ग म्हणून उभारण्यात आलेला तात्पुरता पूल नदीच्या तीव्र प्रवाहात वाहून गेला. परिणामी, या महत्त्वपूर्ण महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

जालना: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बळीराजा सुखावला
जालना शहर आणि लगतच्या परिसरात काल सायंकाळी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. विशेषतः पेरणीसाठी चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे आशेचे वातावरण निर्माण झाले असून, शेतीच्या कामांना आता गती मिळण्याची चिन्हे आहेत.

चंद्रपूर: तीव्र उष्णतेनंतर मुसळधार, पाणीटंचाईचे संकट टळणार?
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काल निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळाला. सकाळपासून कडक ऊन आणि तीव्र तापमान असताना, दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सामान्यतः चंद्रपुरात मान्सूनच्या आगमनाची तारीख ७ जून असते; मात्र यंदा प्रदीर्घ विलंबाने का होईना, पण मान्सूनचा पहिला जोरदार पाऊस बरसला. सुमारे तासभर चाललेल्या या सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तीव्र उन्हाच्या झळांपासून सुटका झाली.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या