Ram Mandir Donation Scam: अयोध्या राम मंदिराच्या देणगीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर आता मंदिराला अर्पण केलेल्या 200 किलो चांदीच्या विटा आणि सुवर्ण बार बेपत्ता झाल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. यामध्ये विरोधी पक्ष आणि ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ने (IBJA) गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.
यामध्ये शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंदिर उभारणीच्या काळात दान केलेली 4 किलोची चांदीची वीट देखील गायब असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आता प्राथमिक चौकशीनंतर मोठा खुलासा केला आहे. राम मंदिरातील सुमारे 200 किलो चांदी चोरीला गेल्याचे सर्व दावे आणि तर्कवितर्क एसआयटीने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
Ram Mandir Donation Scam: नेमकं काय घडलं चांदीच्या विटांचं? एसआयटी रिपोर्टमधील प्रमुख खुलासे:
सुरुवातीला तपासादरम्यान चांदी साठवून ठेवल्याची जागा आणि पावत्यांचे रेकॉर्ड शोधण्यात अडचणी आल्या होत्या. मात्र, तपास पुढे सरकल्यानंतर एसआयटीला खालील महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत:
- विटा वितळवण्यासाठी पाठवल्या: मंदिर ट्रस्टच्या अधिकृत नोंदीनुसार, देणगी म्हणून मिळालेल्या बहुतांश चांदीच्या विटा या पुढील प्रक्रियेसाठी आणि वापरासाठी वितळवायला पाठवण्यात आल्या होत्या. यामध्ये अनुक्रमांक 96 अंतर्गत नोंद असलेल्या 8 चांदीच्या विटांचा समावेश आहे.
- सरकारी टांकसाळीत सुपूर्द: दुसरी एक मोठी बॅच केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन’कडे पाठवण्यात आली होती, जिथे नाणी आणि इतर सरकारी वस्तू बनवल्या जातात. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि संबंधित सरकारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेली यादी एसआयटीच्या हाती लागली आहे.
उद्धव ठाकरेंची वीट आणि सराफा असोसिएशनच्या आरोपांचे सत्य:
या वादाची सुरुवात कशी झाली आणि त्यात काय तथ्य आढळले, याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- अनुराग रस्तोगी यांचे दावे अयोग्य: आयबीजेए (IBJA) चे अध्यक्ष अनुराग रस्तोगी यांनी आरोप केला होता की, देशभरातील ज्वेलर्सनी मिळून दिलेली 60 किलो चांदी आणि त्यांनी स्वतः दिलेला 3 किलोचा चांदीचा दिवा मंदिरात कुठेच दिसत नाही. मात्र, एसआयटीने कागदपत्रे तपासल्यानंतर रस्तोगी यांचे हे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
- २ टप्प्यांत झाली चांदीची नोंद: ट्रस्टच्या अधिकृत रेकॉर्डनुसार, चांदीची देणगी प्रामुख्याने 2 टप्प्यांत जमा झाली होती. पहिल्या नोंदीनुसार 21 ते 28 जुलै 2020 दरम्यान 38 किलो चांदी मिळाली होती. त्यानंतर 29 जुलै 2020 रोजी 25.576 किलो चांदीच्या विटांची नोंद झाली होती. ही सर्व चांदी कागदोपत्री सुरक्षित आहे.
- संजय राऊत यांचे प्रश्न: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून प्रश्न विचारला होता की, उद्धव ठाकरेंनी दिलेली 4 किलो चांदीची वीट आणि 1 कोटी रुपयांच्या देणगीची पावती ट्रस्टने का दिली नाही? मात्र, एसआयटीने स्पष्ट केले आहे की, चांदी कुठेही चोरीला गेलेली नसून ती अधिकृत दस्तऐवजांमध्ये नोंदवलेली आहे.
देणगी चोरीप्रकरणी एफआयआर; चंपत राय यांचा थेट राजीनामा
चांदी चोरीचे आरोप फेटाळण्यात आले असले, तरी राम मंदिराच्या रोख देणगीमधील घोटाळा मात्र खरा ठरला आहे. गुरुवारी याप्रकरणी रीतसर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे:
- 7 ते 7.5 कोटी रुपये गायब: राम मंदिराच्या बँक खात्यातून आणि देणगीतून साधारण 7 ते 7.5 कोटी रुपयांची रोख रक्कम बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे.
- 8 जणांना अटक: या महाघोटाळ्यात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामध्ये राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा चालक आणि जवळचा साथीदार रामशंकर यादव उर्फ टिन्नू यादव याचाही समावेश आहे.
- चंपत राय यांचे पद सोडले: आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे नाव या घोटाळ्यात आल्यानंतर, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शुक्रवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.









