Sonam Wangchuk- नीट, सीबीएसई घोटाळ्याची जबाबदारी घेऊन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि आत्महत्या केलेल्या नीटच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये द्यावे या मागणीसाठी प्रसिद्ध शिक्षण व पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक हे गेले 17 दिवस उपोषण आंदोलन करीत आहेत. आज 18 व्या दिवशी त्यांचे 8.9 किलो वजन कमी झाले असून शरीरात वेदना होत आहेत. पण सरकार त्यांच्याशी चर्चा करायलाही तयार नाही. अखेर एका सामाजिक कार्यकर्त्याने कोर्टात धाव घेत मागणी केली की, वांगचुक यांना ताब्यात घेऊन त्यांना जबरदस्तीने अन्न भरवा, त्यांना तुम्ही असे मरायला सोडू शकत नाही, पण कोर्टाने यावर निर्णय देण्याऐवजी केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. सरकारने टाळाटाळ करीत सोमवारनंतर उत्तर दिले आणि मग त्यानंतर युक्तिवाद होऊन निर्णय देण्याचे न्यायालयाने ठरविले तर तोपर्यंत वांगचुक यांचे प्राण जातील.
झीनत आमान, शबाना आझमी, स्वरा भास्कर पासून अनेक दिग्गज नेत्यांनी वांगचुक यांना जाहीर पाठिंबा देत चिंता व्यक्त केली आहे. अनेक मान्यवर दिल्ली गाठून त्यांची भेट घेत आहेत. पण अडचण अशी आहे की, सोनम वांगचुक यांच्या लढ्याला पाठिंबा असला तरी अनेकांचा कॉकरोच पार्टी आणि दीपके यांना पाठिंबा नाही. त्यामुळे या आंदोलनातवांगचुक सहभागी झाल्यावरही आंदोलकांची संख्या फारशी वाढली नाही. 20 जुलैला कॉकरोच पार्टीचा संसदेवर मोर्चा आहे. पण दीपके यांना पाठिंबा फारसा नसल्याने या मोर्चाला किती पाठिंबा मिळेल आणि या मोर्चाला अफाट प्रतिसाद मिळेल याची खात्री नाही. जर हा मोर्चा अपयशी ठरला तर मात्र केंद्र सरकार दीपके आणि वांगचुक यांच्याकडे अजिबातच लक्ष देणार नाही. तसे झाले तर वांगचुक यांचा मृत्यू होण्याचा धोका आहे. सायको शायर म्हणतो त्याप्रमाणे जर वांगचुक यांचा मृत्यू झाला तर आपल्या थ्री इडियट्स सिनेमात होता तसा सर्वांतील रँचो कायमचा मरणार आहे.
पेशाने वकील असलेले सामाजिक कार्यकर्ते अॅड राकेश कुमार सैनी यांनी सोनम यांच्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सामाजिक आणि मानवी हक्कांसाठी लढणारे सोनम वांगचूक हे घटनेने दिलेल्या मुलभूत हक्कांचा वापर करत सरकारच्या अत्यंत निषेधार्ह आणि सर्वाधिक टीका झालेल्या कृत्याचा निषेध करत आहेत. त्यांनी स्वतःचा जीव पणाला लावला आहे. त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर ती देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी लाजिरवाणी गोष्ट ठरेल. त्यामुळे वांगचूक यांचा जीव वाचवण्यासाठी सरकारला तातडीचे निर्देश द्या,अशी आग्रही मागणी अॅड सैनी यांनी केली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी केंद्र सरकारच्या वतीने कोणीही वकील आज न्यायालयात हजर नाही. तरीही या विषयाचे गांभीर्य ओळखून आम्ही ही याचिका तातडीने सुनावणीसाठी घेत आहोत.
उद्या याचिकेवर सुनावणी घेतली जाईल, असे खंडपीठाने सांगितले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वांगचूक यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करणार्या सरकारचा निषेध केला. आपल्या देशाचे सरकार कृतघ्न आहे. ज्या माणसाने आपले आयुष्य, आपल्या देशातील शिक्षण पद्धती व पर्यावरण या कारणांसाठी अर्पण केले, त्या सोनम वांगचूक यांच्या 18 दिवसांच्या उपोषणाला सरकारने दिलेला निर्दयी प्रतिसाद पाहवत नाही. त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे. या सरकारच्या निर्दयतेचा तीव्र निषेध, असे दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर त्या वांगचूक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विमानाने दिल्लीला रवाना झाल्या.
वकील असीम सरोदे यांनीदेखील एक्स पोस्ट करून सरकारच्या निर्दयीपणाचा निषेध केला. त्यांनी म्हटले आहे की, सोनम वांगचूक यांना पाठिंबा परंतु अभिजित दिपकेला पाठिंबा नाही हे नॅरेटिव्ह अन्यायग्रस्त परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात अडथळा करू शकते. त्यातच उपोषणस्थळी काही जणांनी नाच करणे विषयाचे गांभीर्य नष्ट करणारे आहे. सोनम वांगचूक हे भारतातील एक महत्वाचे विचारवंत व्यक्ती आहेत.सरकारच्या वतीने त्यांना कोणीच भेटायला जात नाहीत हा निर्दयीपणा आहे.तसेच राहुल गांधी,अखिलेश यादव यांनी वांगचूक यांना भेटायला न जाणे हा असंवेदनशीलपणा भारतीय राजकारणाचा स्तर खालावणारा आहे. दरम्यान, वांगचूक यांच्या समर्थनार्थ अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने उद्या एक दिवसाचे सामूहिक उपोषण करण्यात येणार आहे.
वजन 8.9 किलोने घटले
रक्तदाबही कमी झाला
वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी आज जारी केलेल्या निवेदनात त्यांचे वजन मागील 24 तासांत 400 ग्रॅमने घटून 57.15 किलोपर्यंत पोहोचले आहे. मागील 17 दिवसांत त्यांच्या वजनात एकूण 8.9 किलोने घट झाली आहे. त्यांचा रक्तदाबही 105-76 इतका कमी झाला आहे.









