मेट्रो ३ स्टेशन पुन्हा पाण्यात! वरळी बीकेसीमध्ये गळती थांबेना

water leakage in metro3

मुंबई – मुंबई मेट्रो ३ (metro3) प्रकल्पातील बीकेसी आणि वरळी स्थानकांमध्ये गळतीचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी साचल्याच्या घटनेनंतर आता बीकेसी मेट्रो स्थानकात भिंतींना ओलावा, छतातून पाणी गळती होत आहेत. यापूर्वी एमएमआरसीने गळती होत असलेल्या ठिकाणी पाण्याच्या बादल्या ठेवल्या होत्या. त्यामुळे एमएमआरसीवर टीका झाली होती. गळतीमुळे पसरलेले पाणी कर्मचारी सतत पाणी पुसत आहेत. या समस्येमुळे मेट्रो प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

यावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी बीकेसी मेट्रो स्थानकातील गळतीचे फोटो शेअर करत म्हटले की, “मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईनने आपले नाव खरेच सार्थ ठरवले आहे. पाऊस नसतानाही पाण्याचा जोर कायम आहे. छत सतत गळत आहे, इतके की एक भाग अगदी बंद करून ठेवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी अचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी साचलेले पहिले, तर काही स्थानकांवर ताडपत्रीने झाकलेले बाहेरचे मार्गही पाहिले. पण प्रश्न असा आहे की, या ढिसाळ कामांसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा ठेकेदारांवर कोणती कारवाई झाली आहे का? हे ट्रिपल इंजिन भ्रष्ट सरकार जनतेच्या जीवाशी खेळत आहे आणि महाराष्ट्राची लूट करत आहे. यांना लाज वाटली पाहिजे.”