अशांत जग ! योग हाच शांतीचा मार्गपंतप्रधान मोदींचा विशेष संदेश

विशाखापट्टणम – भारतासह जगभरात आज ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. यावर्षी एक पृथ्वी एक आरोग्य ही योगदिनाची संकल्पना होती. योगदिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात १ लाखहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विशाखापट्टणममध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत या कार्यक्रमात ३ लाख लोक आणि ४० देशांतील राजदूतांनी सहभाग घेतला होता. यावेळी योगाची महती सांगताना ते म्हणाले की, आज संपूर्ण जग तणाव आणि अशांततेतून जात आहे. अनेक देशांमध्ये अस्थिरता वाढली आहे. या परिस्थितीत योग आपल्यासाठी शांततेचा मार्गदर्शक ठरू शकतो.

विशाखापट्टणमच्या आरे के बीचवर झालेल्या या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी एका विशेष स्मारक टपाल तिकिटाचे अनावरण केले. मोदी म्हणाले की, योग हे जीवनातील असे पॉज बटण आहे, जे मानवाला श्वास घेण्यासाठी, संतुलन राखण्यासाठी आणि पुन्हा नवीन दमाने पुढे जाण्यासाठी क्षणभर विश्रांती देते. योगचा साधा अर्थ होतो जोडणे. योगामुळे संपूर्ण विश्व जोडले आहे आणि ते पाहणे सुखद आहे. मी दशकभरापासून योग दिनाच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. त्यानिमित्ताने काही आठवणी डोळ्यासमोर येतात. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत भारताने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा कमी कालावधीत १७५ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. या प्रस्तावासाठीची एकजूट ही सामान्य गोष्ट नव्हती. हा फक्त एका प्रस्तावाला समर्थन देण्याचा विषय नव्हता, तर मानवतेसाठी केलेला हा एक सामूहिक प्रयत्न होता. या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जगाला माझी विनंती आहे की, मानवतेसाठी नवी सुरुवात करुया. जिथे आंतरिक शांतता हे जागतिक धोरण असेल.

ते पुढे म्हणाले की, आज जगापुढे लठ्ठपणाच्या समस्येचे मोठे आव्हान आहे. मी मन की बात या कार्यक्रमातही यावर बोललो होतो. त्यावेळी आहारातून १० टक्के तेल कमी करण्याचे आव्हान मी दिले होते. आज देश आणि जगातील लोकांना मी हे आव्हान पुन्हा देत आहे. आपल्या जेवणातून आपण १० टक्के तेल कसे कमी करू शकू, याबाबत जागरुकता निर्माण करा. तेलाचे सेवन कमी करणे, आरोग्यास अपायकारक असलेल्या खाद्यपदार्थांपासून दूर राहणे आणि नित्य योग करणे, हे निरोगी आयुष्याचे चांगले औषध आहे. योग हा कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आपले दिव्यांग मित्र ब्रेलमध्ये योगशास्त्र वाचतात, हे पाहून मला अभिमान वाटतो. शास्त्रज्ञ अंतराळात योग करतात. गावागावातील तरुण मित्र योग ऑलिंपियाडमध्ये सहभागी होतात. भारत जगात योगाचा प्रसार करण्यासाठी आधुनिक संशोधनाद्वारे योग विज्ञानाचा विस्तार करत आहे. आम्ही योगाच्या क्षेत्रात पुराव्यावर आधारित थेरपीलादेखील प्रोत्साहन देत आहोत. दिल्ली ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसने यासंदर्भात चांगले काम केले आहे.

११ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आंध्रप्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांनी आज विश्वविक्रम नोंदवला. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली. विशाखापट्टनममध्ये तीन लाख लोकांनी एकत्र येऊन योग केला. तर २२ हजार विद्यार्थ्यांनी एका वेळी १०८ मिनिटांत १०८ सूर्यनमस्कार केले. हे दोन विक्रम आंध्रप्रदेशच्या नावावर नोंदवण्यात आले. तर गुजरातमध्ये दोन हजार लोकांनी २ मिनिटे ९ सेकंद भुजंगासन करून विक्रम केला.

मुख्यमंत्री फडणवीस योगीच
पत्नी अमृतांचे वक्तव्य

मुंबई – आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई मनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या योग शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योगीच आहेत. ते कधीच कसरत करत नाहीत. पण ध्यानधारणा करत असतात.

Share:

More Posts