Ayodhya Ram Mandir: अयोध्या येथील भव्य श्री राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार आणि चोरीच्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेनंतर आता ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’मध्ये अत्यंत मोठे प्रशासकीय फेरबदल करण्याचे पाऊल उचलले जात आहे.
मंदिराचे आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्थापन अधिक पारदर्शक व कडक करण्यासाठी ट्रस्टमध्ये आता एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (CEO) नियुक्ती केली जाणार असल्याची विश्वासनीय माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिर निर्माण समितीचे विद्यमान अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. भाविकांच्या देणगीवर डल्ला मारल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल करून 8 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर लगेचच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
चंपत राय यांचा राजीनामा; ट्रस्टकडून भाविकांना मोठे आश्वासन
या संपूर्ण वादानंतर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टी अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून, ट्रस्टने त्याला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. या धक्कादायक घडामोडींदरम्यान, ट्रस्टने देशातील कोट्यवधी रामभक्तांना आश्वस्त करण्यासाठी एक विशेष पत्रक प्रसिद्ध केले आहे:
- दागिने आणि विटा सुरक्षित: भाविकांनी प्रभू श्री रामाच्या चरणी किंवा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांकडे वैयक्तिकरित्या सुपूर्द केलेल्या चांदीच्या विटा, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू पूर्णपणे सुरक्षित असून त्यांची योग्य नोंद ठेवण्यात आली आहे.
- भविष्यात काळजी घेणार: गेल्या काही दिवसांत घडलेल्या प्रकारामुळे ट्रस्टला प्रचंड धक्का बसला असून सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. भविष्यात अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत म्हणून तातडीने कठोर उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन ट्रस्टने दिले आहे.
विरोधी पक्ष आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी
या देणगी चोरीच्या प्रकरणावरून आता देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि ट्रस्टवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश प्रसाद सिंह यांनी या प्रकरणातील भ्रष्टाचार अत्यंत खोलवर रुजलेला असल्याचा आरोप केला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच लोकांचा विश्वास गमावलेला हा ट्रस्ट तात्काळ बरखास्त करून गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींना अटक करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे.
समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) विश्वासार्हतेवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा देणगी चोरीचा प्रकार आजचा नसून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, ज्यामध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. जमिनीच्या व्यवहारातही मोठा गैरव्यवहार झाला असल्याने, या प्रकरणाची एसआयटीपेक्षाही मोठ्या केंद्रीय यंत्रणेमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
सध्या उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्ह्यातील सर्व 8 संशयित आरोपींना अटक केली असून, रोकड आणि मौल्यवान वस्तूंच्या चोरीचा तपास विविध अंगांनी सुरू आहे.










