Samajwadi Party Split : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लागलेल्या भगदाडानंतर, आता उत्तर प्रदेशच्या राजकीय पटलावरही मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात (सप) लवकरच उभी फूट पडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी या संदर्भात एक अत्यंत खळबळजनक दावा केल्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
ओमप्रकाश राजभर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दावा केला की, समाजवादी पक्ष सध्या अंतर्गत पातळीवर मोठ्या संकटातून जात असून, संपूर्ण पक्षच भाजपामध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे. या विधानामागे त्यांनी एका पत्राचा हवाला दिला आहे. राजभर यांच्या म्हणण्यानुसार, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र सुपूर्द केले आहे. उत्तर प्रदेशातील बहुचर्चित खाण घोटाळा आणि गोमती रिव्हर फ्रंट विकास प्रकल्पातील गैरव्यवहार यांमागे नेमका कोणाचा हात होता, हे राज्यातील जनतेला भलीभांती ठाऊक आहे, असा टोला त्यांनी लगावला. या घोटाळ्यांच्या चौकशीचा फास जसाजसा आवळला जात आहे, तसतशी समाजवादी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची अस्वस्थता आणि भीती वाढत चालली असून, याच कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी संपूर्ण पक्ष भाजपच्या वाटेवर असल्याचा गंभीर आरोप राजभर यांनी केला.
दरम्यान, राजभर यांच्या या वादग्रस्त आणि थेट विधानावर समाजवादी पक्षाकडून अत्यंत तीव्र आणि आक्रमक प्रतिक्रिया उमटली आहे. समाजवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते सुनील साजन यांनी राजभर यांचे सर्व दावे फेटाळून लावत पलटवार केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या गोटात प्रचंड भीतीचे व निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे, असे साजन म्हणाले. राजभर यांचे विधान म्हणजे केवळ या भीतीपोटी केलेली निरर्थक बडबड आहे, अशी टीका त्यांनी केली.
पुढे बोलताना सुनील साजन यांनी असा विश्वास व्यक्त केला की, उत्तर प्रदेशातील जनता आता भाजपच्या धोरणांना कंटाळली असून २०२७ च्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून बेदखल करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. राजभर यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी भाकीत केले की, आगामी निवडणुकीत सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचा एकही आमदार विधानसभेत निवडून येऊ शकणार नाही; जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.










