Trinamool Congress : लोकसभेच्या मान्सून अधिवेशनापूर्वी देशाच्या राजकारणात एक अतिशय मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली असून पक्षाच्या 28 लोकसभा खासदारांपैकी तब्बल 20 खासदारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोर गटाने आता एका प्रादेशिक राजकीय पक्षासोबत विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
बंडखोर गटाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार काकोली घोष दस्तिदार यांनी आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत पत्र सोपवले. या निर्णयानंतर आता हे सर्व खासदार संसदेत स्वतंत्र बाकांवर बसणार आहेत. आपल्याकडे दोन-तृतीयांश बहुमत असल्याचा दावा या गटाने केला असून ते केंद्र सरकारमधील एनडीए आघाडीचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत.
बंडखोर खासदारांनी काय घेतला निर्णय?
कायदेशीर कचाट्यातून आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईतून वाचण्यासाठी बंडखोरांनी एका अज्ञात पक्षाची निवड केली आहे:
- नॅशनालिस्ट सिटीझन्स पार्टीत प्रवेश: बंडखोर खासदार हे ‘नॅशनालिस्ट सिटीझन्स पार्टी’ या बंगालमधील एका छोट्या प्रादेशिक पक्षात प्रवेश करणार आहेत. या पक्षाने यापूर्वी त्रिपुरामध्ये निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना तिथे यश आले नव्हते.
- नाव मिळवण्याचा दावा: पक्षाचे प्रमुख नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही दोन-तृतीयांश बहुमतासह मूळ पक्ष सोडता, तेव्हा पहिल्याच दिवशी मूळ पक्षाच्या नावावर दावा करता येत नाही. परंतु, जुलै महिन्यात आम्ही निवडणूक आयोग आणि न्यायालयात मूळ ‘तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि चिन्हावर दावा ठोकणार आहोत.
हा तर थेट विश्वासघात; तृणमूल काँग्रेस आक्रमक
या मोठ्या बंडखोरीनंतर मूळ तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या खासदारांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मदन मित्रा यांनी म्हटले आहे की, या खासदारांनी ममता बॅनर्जी यांच्या नावाने आणि पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकली होती. आता त्यांनी घेतलेला निर्णय हा मतदारांशी आणि पक्षाशी केलेला थेट विश्वासघात आहे.
हा संपूर्ण वाद न्यायालयात नेणार का, असे विचारले असता मदन मित्रा म्हणाले की, याचा अंतिम निर्णय ममता बॅनर्जी घेतील. दोन-तृतीयांश खासदारांच्या संख्याबळावर बोलताना त्यांनी टोला लगावला की, नवीन गट तयार करण्यासाठी ही संख्या पुरेशी नाही, अजून बरीच कायदेशीर प्रक्रिया बाकी असून ही तर केवळ सुरवात आहे.
अभिषेक बॅनर्जींचा लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे इशारा
बंडखोरांची घोषणा होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष आणि कीर्ती आझाद यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिलेले एक महत्त्वाचे पत्र अध्यक्षांना सुपूर्द केले.
या पत्रात अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट म्हटले आहे की, संसदेत राजकीय पक्ष सर्वोच्च असतो, लोकप्रतिनिधींचा गट नाही. कोणताही गट स्वतःच्या मर्जीने पक्षात समांतर गट तयार करून संसदेत स्वतंत्र मान्यतेची मागणी करू शकत नाही. कायद्यानुसार राजकीय पक्षाचे विघटन मान्य नाही आणि अशा बंडखोर सदस्यांना थेट अपात्र ठरवले पाहिजे, अशी मागणी तृणमूलने केली आहे. आता या सर्व हायव्होल्टेज राजकीय नाट्यावर लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.









