BB Marathi Season 6 : गेल्या जानेवारी महिन्यात १७ तडाखेबंद स्पर्धकांसह दिमाखात सुरू झालेला ‘बिग बॉस मराठी’चा सहावा हंगाम आता आपल्या अंतिम आणि सर्वात उत्कंठावर्धक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. प्रख्यात अभिनेता रितेश देशमुख यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने सजलेला हा कार्यक्रम गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून, आता अवघ्या सहा स्पर्धकांमधील महाअंतिम सोहळ्याची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. या प्रवासात प्रेक्षकांनी स्पर्धकांमधील चुरस, वाद, मैत्री आणि भावूक क्षण अनुभवले, परंतु आता खऱ्या अर्थाने विजेतेपदासाठीची ‘रस्सीखेच’ सुरू झाली आहे.
राखी सावंतचे अनपेक्षित एलिमिनेशन आणि अंतिम ६ शिलेदार-
गेल्या शनिवारी, ११ एप्रिल रोजी ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हिला या घरातून निरोप घ्यावा लागला. राखीचे एलिमिनेशन प्रेक्षकांसाठी अत्यंत धक्कादायक ठरले, कारण ती विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती. तिच्या एलिमिनेशननंतर आता घरात राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि रेवा कौरासे हे सहा स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. या सहाही स्पर्धकांमध्ये बिग बॉसची प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस निर्माण झाली असून, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.
‘तिकीट टू फिनाले’ आणि व्होटिंग ट्रेंड्सचा कौल:
अंतिम आठवडा सुरू होण्यापूर्वी निर्मात्यांनी खेळात एक नवीन वळण आणले. तन्वी कोलतेने राकेश बापट आणि अनुश्री मानेवर मात करत ‘तिकीट टू फिनाले’ पटकावून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. दरम्यान, व्होटिंग ट्रेंड्सनुसार सध्या तन्वी कोलते ही लोकप्रियतेच्या शिखरावर असून ती पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. नेटकऱ्यांकडून आणि प्रेक्षकांकडून तिला मिळणारा मोठा पाठिंबा पाहता, ती या सिजनची विजेती ठरेल का? अशी चर्चा रंगली आहे. तन्वी पाठोपाठ राकेश बापट दुसऱ्या क्रमांकावर असून अनुश्री मानेला तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली आहेत.
मिड-वीक एलिमिनेशनची टांगती तलवार कोणावर?
महाअंतिम सोहळा जवळ येत असतानाच निर्मात्यांनी ‘मिड-वीक एलिमिनेशन’चा (मध्यरात्री होणारी हकालपट्टी) ट्विस्ट आणला आहे. १३ एप्रिल दुपारी १:३० वाजेपर्यंत व्होटिंग लाईन्स सुरू होत्या. व्होटिंग ट्रेंड्सनुसार, दिपाली सय्यद, रेवा कौरासे आणि विशाल कोटियन हे तीन स्पर्धक सध्या ‘बॉटम ३’ मध्ये म्हणजेच धोक्याच्या छायेत आहेत. या तिघांपैकी कोणा एकाला ग्रँड फिनालेपूर्वीच घराबाहेर पडावे लागेल. त्यामुळे आता या सहा जणांपैकी नक्की कोण अंतिम पाचमध्ये स्थान मिळवणार आणि कोणाचे स्वप्न शेवटच्या क्षणी भंगणार, याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.









