Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis : कोणाचेही घर बॉम्बने उडू देणार नाही, पोकळ धमक्यांना घाबरू नका; संजय राऊत विरुद्ध संजय दिना पाटील वादावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया..

Devendra Fadnavis : कोणाचेही घर बॉम्बने उडू देणार नाही, पोकळ धमक्यांना घाबरू नका; संजय राऊत विरुद्ध संजय दिना पाटील वादावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया..

Devendra Fadnavis : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना...

By: Team Navakal
Devendra Fadnavis
Social + WhatsApp CTA

Devendra Fadnavis : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील राजकीय संघर्ष आता कमालीचा विकोपाला गेला आहे. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे ईशान्य मुंबईत ठाकरे सेना आणि शिंदे सेना आमनेसामने आल्या असून संपूर्ण परिसरात प्रचंड राजकीय तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक खळबळजनक पत्र लिहून संजय दिना पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या सर्व प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची आणि पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पोकळ धमक्यांना कोणी घाबरू नये; पोलीस योग्य उत्तर देतील: देवेंद्र फडणवीस
संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यातील या वादावर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कायदा व सुव्यवस्थेची ग्वाही दिली. ते म्हणाले की, “कोणाचेही घर बॉम्बने उडवण्याची भाषा सहन केली जाणार नाही. आम्ही कोणाचेही घर बॉम्बने उडू देणार नाही आणि अशा पोकळ धमक्यांना कोणीही घाबरण्याचे कारण नाही. जर कोणी अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल किंवा धमक्या देत असेल, तर पोलीस दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ते चोख उत्तर देईल.”

संजय राऊतांचा ‘लेटर बॉम्ब’: पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातील गंभीर आरोप
खासदार संजय राऊत यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटलेले सहा खासदार हे संपूर्ण देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. त्यांनी मतदारांची घोर फसवणूक केल्यामुळे सर्वसामान्य जनता संतप्त झाली असून, लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. लोकप्रतिनिधीला जाब विचारणे हा सुजाण नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. परंतु, ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय पाटील हे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना थेट जीवे मारण्याची धमकी देत आहेत.”

“पाच जणांची हत्या केली, आंदोलकांवर बॉम्ब टाकेन”; संजय पाटलांच्या कथित धमकीचा उल्लेख
संजय राऊत यांनी आपल्या पत्रात संजय पाटील यांच्या कथित वक्तव्याचा दाखला देत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. राऊत यांच्या पत्रातील दाव्यानुसार, संजय पाटील यांनी म्हटले आहे की, “माझ्या वाटेला जाऊ नका. माझ्याविरोधात आंदोलन करायचे असेल तर आधी स्वतःच्या जिवाचा विमा उतरवून घ्या. मी तुम्हाला थेट स्मशानात किंवा रुग्णालयात पाठवीन.”

याहूनही गंभीर आरोप करताना राऊतांनी पत्रात लिहिले आहे की, पाटील यांनी “मी यापूर्वी ५ लोकांना ठार केले आहे आणि आता जर माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले, तर मी त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, त्यांच्या घरात घुसून त्यांना मारेन,” अशी उघड धमकी दिली आहे. या पाच लोकांच्या हत्येची कबुली खुद्द लोकप्रतिनिधीनेच दिल्यामुळे, त्यांच्याविरोधात तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

खासदार पाटील यांच्या घराची झाडाझडती घेण्याची आणि ‘यूएपीए’ अंतर्गत अटकेची मागणी
खासदार संजय पाटील यांच्याकडे स्फोटके असण्याची शक्यता वर्तवत संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांकडे त्यांच्या घराची झडती घेण्याची आग्रही मागणी केली आहे. एका खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे सांगत राऊत म्हणाले, “हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरातच तयार केले आहेत का, याचा तपास करण्यासाठी त्यांच्या घराची त्वरित झडती घेण्यात यावी. या तपासासाठी दहशतवादविरोधी पथकाची (ATS) मदत घेण्यात यावी.”

हा संपूर्ण प्रकार राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून खासदार संजय दिना पाटील यांना तात्काळ ‘यूएपीए’ (UAPA) कायद्यांतर्गत अटक करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी राऊत यांनी केली आहे. या पत्रयुद्धामुळे आता शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील ४८ तासांत ‘मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा ‘हा’ अंदाज नक्की वाचा- राज्यातील प्रमुख जिल्ह्यांना २७ जुलैपर्यंत रेड आणि ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी