Raj Thackeray : उबाठाचे खासदार व आमदार फोडण्याच्या राजकारणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज कडव्या भाषेत टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, प्रश्न विकत घेणार्यांचा नाही तर विकले जाणार्यांचा आहे. आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिर्हाईक आहेतच. हे कुठच्या प्रकारचे राजकारण सुरू आहे? पूर्वी पत्त्याचा बंगला करायचे ना त्या पत्त्याचा हा उलटा बंगला आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळे कोसळणार आहेत. जे काही आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवर टिकून आहे. या बाकीच्यांवर नाही. अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचे भयानक राजकारण खेळतात हे त्यांनाही अंगाशी येणार आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, एसआयआरचा सगळ्यात मोठा फटका पश्चिम बंगाल, बिहारला सर्व मतदारसंघात बसला. पश्चिम बंगालमधील जवळपास 27 लाख मते याअंतर्गत काढली गेली. ममता बॅनर्जीं सारख्या माजी मुख्यमंत्र्याचाही पराभव होतो ही काही साधी सरळ गोष्ट नाही. देशामध्ये खूप घाणेरडे आणि खूप भयानक राजकारण चालू आहे. याचा फटका भविष्यात भाजपालाही मिळणारच आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नसतो. फक्त प्रश्न असा आहे की आपण करत असलेली कृती हा भविष्यातील पायंडा ठरतो आहे याचे भान राजकीय पक्षांना अथवा नेत्यांना नसेल तर मला पुढच्या पिढ्यांची चिंता जास्त वाटते. राजकारण काय येते जाते. पण शेवटी आपण महाराष्ट्र कुठे नेणार आहोत? देश कुठे नेणार आहोत? महाराष्ट्रात फोडाफोडीचेच सगळे राजकारण सुरू आहे.
हे काही उमदे राजकारण नव्हे. चांगले राजकारण नव्हे. उद्या सत्ता गेल्यावर या अशाच प्रकारच्या गोष्टींचा भारतीय जनता पक्षालाही त्रास होईल. त्यावेळेला काय करतील? आपण काय करतोय? कुठपर्यंत जातोय? कुठपर्यंत जायचे? याला काही मर्यादा आहेत की नाही? मी अनेकदा आमच्या लोकांना सांगत आलो आहे की जगात ज्या वेळेला एखाद्या सत्ताधार्याने त्याचे विरोधक संपवलेले आहेत त्या त्या वेळेला त्यांच्यातच विरोधक आणि दुश्मन तयार झालेले आहेत. त्यांनीच त्यांना संपवलेले आहे. ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे बाहेरचे विरोधी पक्ष तुम्ही संपवणे हे सोडून द्या. आता तुमच्यात जे विरोधक निर्माण झालेले आहेत यातून तुम्हाला जो त्रास होईल तो तुम्ही बघत राहा. हा जगाचा इतिहास आहे. तुम्ही विरोधक संपवलेत की तुमच्यात आतच विरोधकनिर्माण होतात.
राज ठाकरे म्हणाले की, सगळे अमित शहांचे राजकारण सुरू आहे. आता शिवसेनेचे सहा खासदार फोडले ते भाजपामध्ये का नाही गेले? तृणमूलचे 22 खासदार फुटले त्यांनी वेगळा गट का केला? उद्या मला दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावर तेव्हा मला आतमध्ये विरोध झाला तर मला बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील आणि दुसर्यांनी जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहे यातला कोणी त्यांना पाठिंबा देणार नाहीत. तुम्ही विरोधक संपवता त्यावेळेला दुश्मन तुमच्यातच तयार होतात. तेच चित्र आता तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात सर्व ठिकाणी दिसेल. अगदी खालपर्यंत दिसेल. बेधुंद सत्ता ज्यावेळेला येते त्यावेळेला माणसे अशी वागायला लागतात.










