Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ (VSR) ही विमान कंपनी सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या भीषण अपघातात अजित पवारांचे निधन होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, या प्रकरणाचा सखोल छडा अद्याप लागलेला नाही. अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे या अपघाताच्या मुळाशी जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, त्यांनी ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानांच्या सुरक्षेबाबत आणि कारभारावर अनेक गंभीर आरोप करत चिखलफेक केली. असे असतानाही, राजकीय वर्तुळातील नेते मात्र अजूनही याच वादग्रस्त कंपनीच्या विमानांनी प्रवास करत असल्याचे धक्कादायक वास्तव आजही समोर आहे.
याच पार्श्वभूमीवर, अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खाजगी विमानाबाबत ९ जून रोजी एक मोठी घटना घडल्याची माहिती आता उघड झाली आहे. ९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार या एका खाजगी विमानाने मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार होत्या. मात्र, उड्डाणाच्या अगदी ऐनवेळी या विमानात अचानक गंभीर तांत्रिक बिघाड निर्माण झाला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या विमानामध्ये हा बिघाड झाला, ते विमान देखील याच वादग्रस्त ‘व्हीएसआर’ कंपनीचे असल्याचे समोर आले आहे.
या तांत्रिक बिघाडामुळे नियोजित वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता आकाशात झेप घेणारे हे विमान विमानतळावरच रोखून धरावे लागले. या सर्व प्रक्रियेमुळे विमानाचे उड्डाण तब्बल दोन तास लांबले आणि अखेर संध्याकाळी ७ वाजता या विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केले. सुदैवाने हा बिघाड विमान उड्डाण करण्यापूर्वीच लक्षात आल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
तांत्रिक बिघाड आणि विमान बदल-
अधिकच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि खासदार सुनील तटकरे हे नेते एकाच खाजगी विमानाने प्रवास करणार होते. मात्र, विमानाचे उड्डाण होण्यापूर्वीच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. या तांत्रिक बिघाडामुळे या सर्व व्ही.आय.पी. (VIP) मंडळींना विमानतळावरच ताटकळत थांबावे लागले. यानंतर तातडीने हालचाली करत संध्याकाळी ७ वाजता दुसऱ्या पर्यायी विमानाची व्यवस्था केली. त्यानंतरच या तिन्ही नेत्यांनी आपल्या पुढील प्रवासासाठी उड्डाण केले.
या संपूर्ण घटनेतील सर्वात लक्षवेधी आणि गंभीर बाब म्हणजे, आधी बिघडलेले आणि नंतर पर्यायी व्यवस्था म्हणून आणलेले, ही दोन्ही विमाने ‘व्ही.एस.आर.’ (VSR Aviation) याच कंपनीची होती. याच व्ही.एस.आर. कंपनीच्या विमान अपघातात अजित पवार यांना गमावले होते. त्या भीषण दुर्घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीच्या सुरक्षेवर आणि कारभारावर सातत्याने कडाडून टीका केली होती तसेच गंभीर आरोपही केले होते.
एकीकडे एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना आणि विरोधकांकडून या कंपनीवर सातत्याने आक्षेप घेतले जात असतानाही, अजित पवारांच्या कुटुंबातील सदस्य आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजूनही याच कंपनीच्या विमानाने प्रवास करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘एकदा ठेच लागली की माणूस ताकही फुंकून पितो’ परंतु, इथे एका जवळच्या व्यक्तीचा जीव गेलेला असतानाही, संबंधित कुटुंबीय आणि नेतेमंडळी इतकी साधी सतर्कता का बाळगत नाहीत, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही त्याच वादग्रस्त कंपनीच्या सेवांवर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवणे कितपत योग्य आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.









