Vishwas Nangare Patil : अतिशय लोकप्रिय आणि डॅशिंग आयपीएस (IPS) अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी आज नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा (Nagpur Police Commissioner) पदभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतची आपली प्राधान्ये स्पष्ट केलीच, शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीवरून आणि भाषणावरून सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेला तसेच राजकीय नेत्यांच्या आरोपांना अत्यंत संयत आणि कायदेशीर भाषेत चोख उत्तर दिले.
“माझ्या खांद्यावरील ‘S’ म्हणजे सेवा”; गुन्हेगारांवर वचक ठेवणार
पदभार स्वीकारल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरकरांशी संवाद साधताना आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी ‘ऑरेंज सिटी’ आणि ‘टायगर कॅपिटल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरात पहिल्यांदाच आयुक्त म्हणून काम करणार आहे. मुख्यमंत्री आणि सरकारने माझ्यावर दाखवलेला विश्वास पाहता ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, ‘कोर पोलिसिंग’ (Core Policing) करणे, तसेच महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. आमच्या खांद्यावर लावलेल्या ‘IPS’ या अक्षरांमधील ‘S’ चा अर्थ ‘सर्व्हिस’ म्हणजेच जनतेची सेवा असा आहे. त्यामुळे नागपुरातील सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांची अजिबात भीती वाटता कामा नये, तर केवळ गुन्हेगारांमध्येच पोलिसांचा धाक असायला हवा.”
“संविधानाशीच माझी निष्ठा; दीक्षाभूमी आणि बाबासाहेबांचे विचार माझे मार्गदर्शक”
संघाच्या कार्यक्रमातील त्यांच्या सहभागावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना नांगरे पाटील यांनी आपली भूमिका अत्यंत ठामपणे मांडली. ते म्हणाले, “मला समाजातील प्रत्येक घटकाचा आणि सर्वच संघटनांचा प्रचंड आदर आहे. मी एक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असून माझी पूर्ण कटिबद्धता आणि निष्ठा केवळ भारताचे संविधान आणि त्याच्या मूल्यांशी आहे. नागपुरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पवित्र दीक्षाभूमी असून बाबासाहेबांचे विचार हेच माझे खरे मार्गदर्शक आहेत. एका सरकारी अधिकाऱ्याने सामाजिक जीवनात विविध संघटना, संस्था यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाणे आणि तिथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधणे हे अत्यंत स्वाभाविक आहे.”
१९ एप्रिलच्या ‘त्या’ कार्यक्रमाचे वास्तव; सेवा शर्तींचे उल्लंघन नसल्याचे स्पष्टीकरण
ज्या कार्यक्रमावरून त्यांच्यावर आक्षेप घेतले जात आहेत, त्या कार्यक्रमाचे सविस्तर स्पष्टीकरण देताना आयुक्त नांगरे पाटील म्हणाले, “तो कार्यक्रम १९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. सानपाडा परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते त्याचे निमंत्रण घेऊन माझ्याकडे आले होते, ज्यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता. तो कार्यक्रम ‘वंदे मातरम’ या आपल्या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता.
मी गेली ३० वर्षे पोलीस सेवेत अत्यंत प्रामाणिकपणे कार्यरत आहे. आम्ही ज्याप्रमाणे सामाजिक सलोखा राखण्यासाठी रमजान ईदला जातो, इफ्तार पार्टीला हजेरी लावतो, जैन किंवा शीख धर्मीयांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात जातो, त्याच मुख्य प्रवाहाचा भाग म्हणून मी त्याही कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे मी मानवी कल्याणासाठीच्या सामूहिक प्रार्थना बोलून दाखविल्या, संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील ‘पसायदान’ म्हटले. तसेच, तरुणाईला अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) विळख्यापासून वाचवण्यासाठी आणि पोलीस दलातील करिअरच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले. त्यामुळे या कार्यक्रमात उपस्थित राहून मी माझ्या शासकीय नोकरीच्या कोणत्याही सेवा शर्तींचे (Service Rules) किंवा नियमांचे उल्लंघन केलेले नाही.”
“पोलीस सेवेचा राजीनामा द्या”; राज ठाकरेंनी दिला होता थेट सल्ला
विश्वास नांगरे पाटील यांच्या या संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला होता. राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेतून टीका करताना म्हटले होते की, “आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झालेली दिसते आहे. ते एक जबाबदार पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्ये आहेत, त्याच्याशीच असायला हवी. परंतु, नांगरे पाटील यांना त्यांची संघाशी असलेली निष्ठा दाखवण्याची घाई झाली आहे. हिंदू संमेलनात जाऊन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या संस्थापकांवर स्तुतिसुमने उधळली आहेत. जर त्यांना संघाबद्दल एवढीच आपुलकी आणि आत्मियता असेल, तर त्यांनी तात्काळ आपल्या पोलीस सेवेचा राजीनामा द्यावा आणि थेट संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हावे.” राज ठाकरेंच्या या जाहीर सल्ल्यानंतर सोशल मीडियावरही या विषयावरून मोठा गदारोळ माजला होता, ज्यावर अखेर आज नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पडदा टाकला आहे.










