पुणे
राज्यातील अनेक जिल्ह्यांना गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने झोडपले. तर काही ठिकाणी वाढत्या तापमानमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशामध्ये आता हवामान खात्याने पुण्यासह ८ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. त्याचसोबत नागरिकांना काळजी घेण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पावसामुळे शेतपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. सरकारने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.