मुंबई- नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे, हा चुकीचा समज आहे. डिजिटल माध्यमे आल्यामुळे नवी पिढी वाचन सुलभता शोधत आहे. ‘व्यापार सुलभते’प्रमाणेच वाचकांना वाचन सुलभता हवी आहे. ग्रंथ वाचन बंद झाले नाही तर वाचण्याची पद्धत बदलली आहे. त्यामुळे ग्रंथालयांनी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटलायझेशन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
मुंबईचे सांस्कृतिक वैभव असलेल्या एशियाटिक सोसायटीचा २१९ वा वर्धापन दिवस राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २५) रोजी सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला.
यावेळी डॉ सरयू दोशी (भारतीय कला, इतिहास व संस्कृती), डॉ अनुरा मानातुंगा (लेखक व क्युरेटर । कला इतिहास), प्रो. नोबुयोशी नामाबे (बुद्धिस्ट स्टडीज), प्रो गोपाल कृष्ण कान्हेरे (रौप्य पदक) व प्रो. ब्रजकिशोर स्वैन (धर्मशास्त्र – महामहोपाध्याय डॉ पां. वा. काणे सुवर्ण पदक) यांना राज्यपालांच्या हस्ते संस्थेची फेलोशिप व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. संगीतकार झुबीन मेहता, प्रो उपिंदर सिंग व प्रो सुभाष चंद्र मलिक उपस्थित राहू शकले नाहीत.
सोसायटीच्या अध्यक्षा विस्पी बालापोरिया यांनी प्रास्ताविक केले तर मानद सचिव मंगला सरदेशपांडे यांनी आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सब्यसाची मुखर्जी, सोसायटीच्या उपाध्यक्षा शहरनाज नलवाला, डॉ फरोख उदवाडिया आदी उपस्थित होते.