पुणे- मावळमध्ये हॉटेल मालकाने ग्राहकाची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हॉटेल मालक अक्षय येवलेला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
मावळच्या इंदोरीमधील हॉटेल जय मल्हार येथे रात्री पावणेदहा वाजता प्रसाद अशोक पवार आणि त्याचा मित्र अभिषेक अशोक येवले यांनी हॉटेलमधील वेटरला मारहाण केली. वेटरने हॉटेल मालक अक्षयला फोन केला. प्रसाद आणि अभिषेक दोघेही हॉटेल मालकाचे मित्र असल्याने त्यांनी भांडण करू नका, मी तिकडे येत असल्याचे सांगितले. फोनवरच दोघांनी हॉटेल मालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर दोघेही हॉटेलमधून निघून गेले आणि काही वेळाने कोयता घेऊन हॉटेलसमोर आले. अक्षय हा हॉटेल बंद करत होता. त्यावेळी दोघांनी अक्षयसोबत वाद घातला. अक्षयने त्यांच्याच हातातील कोयता घेऊन दोघांवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यात प्रसादचा मृत्यू झाला.










