एसआरएला प्रथम क्रमांक दिल्याने म्हाडा नाराज! पुनर्मूल्यांकन मागणी

मुंबई – १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. यात सर्व महामंडळांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अव्वल क्रमांक पटकावला आहे.मात्र या निवड प्रक्रियेमुळे ‘म्हाडा’ नाराज झाले आहे. म्हाडाला कोणत्याच गटात पुरस्कार मिळालेला नाही.त्यामुळे आता म्हाडाने या मोहिमेच्या सादरीकरणाचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी ‘मित्रा’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी म्हाडाने सादर केलेल्या स्लाईड्समध्ये मास्टर प्लॅनपासून ते अंमलात आणलेल्या प्रत्येक सूचनेचा तपशीलवार आढावा देण्यात आला होता.तरीही एसआरएच्या कामगिरीला प्रथम क्रमांक देणे म्हणजे पुरस्कार निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची चर्चा आहे. राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्षमता, पारदर्शकता व लोकाभिमुखता वाढविण्यासाठी १०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा राबविण्यात आला. या उपक्रमात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबईने प्रथम क्रमांक पटकविला आहे. ७ कलमी आराखड्यांतर्गत एसआरएने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यावरून आता म्हाडा आणि एसआरएमध्ये वादंग निर्माण झाला आहे.