गडचिरोली – गडचिरोलीत मीच सर्वाधिक फिरलो. माझ्याएवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्रात नाही, असा ठाम दावा मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली दौऱ्यात केला.
गडचिरोली पोलिसांच्या वतीने आयोजित आत्मसमर्पित नक्षलवादी युवक-युवतींच्या सामूहिक विवाह सोहळ्यास ते उपस्थित होते. हा विवाह सोहळा पोलिस मुख्यालयात पार पडला. यानिमित्त त्यांनी गडचिरोली येथील अत्यंत दुर्गम भागात जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आपण महाराष्ट्राच्या पहिल्या टोकावर आलो आहोत. इथून छत्तीसगड नजरेस पडतो. पोलिसांच्या उपस्थितीमुळे शासनाच्या योजना आणि त्याचे लाभ इथल्या नागरिकांपर्यंत पोहोचू लागले आहेत. लवकरच गडचिरोलीमधून माओवादी संपुष्टात येतील. २०१४ पूर्वी गडचिरोलीचा विकास फक्त भाषणांतच होता. पण आम्ही प्रत्यक्षात बदल घडवून आणला. आता औद्योगिक विकास करताना येथील जंगल व जमीन वाचवतच पुढे जायचे आहे. गडचिरोलीचा नैसर्गिक स्वभाव बदलण्याचा कुठलाही प्रयत्न केला जाणार नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येथे काम करणारे जवान उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.