झारखंड कोळसा घोटाळा प्रकरण; माजी सचिवांची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली – विशेष सीबीआय न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, माजी संयुक्त सचिव (कोळसा) केएस क्रोफा आणि तत्कालीन संचालक केसी सामरिया यांची कोळसा घोटाळ्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली, तर जेएएस इन्फ्रास्ट्रक्चर कॅपिटल लिमिटेड आणि त्यांचे तत्कालीन संचालक मनोज कुमार जयस्वाल यांना फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल दोषी ठरवले आहे.
झारखंडमधील महुगढी कोळसा वाटप घोटाळा प्रकरणाच्या खटल्यात विशेष न्यायाधीश संजय बंसल यांनी हा आपला निकाल जाहीर केला. यातील दोषींना ८ जुलै रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. हे प्रकरण २००६-०९ दरम्यान कोळसा मंत्रालयाने खाजगी कंपन्यांना कोळसा खाणी वाटप करण्यात झालेल्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या तक्रारीच्या आधारे प्राथमिक चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. तपासात असे आढळून आले की जेआयसीपीएल आणि त्याचे संचालक मनोज जयस्वाल यांनी महुआगढी कोळसा खाण खरेदी करण्यासाठीच्या अर्जात चुकीची माहिती दिली होती आणि महत्त्वाची तथ्ये लपवली होती. यामुळे कंपनीला अयोग्य फायदा झाला. आतापर्यंतच्या देशातील कोळसा खाण घोटाळा प्रकरणातील हा १९ वा निकाल आहे.