अरबी समुद्रात मालवाहू जहाजाला आग! ४ जण बेपत्ता

कोची – केरळच्या कोझिकोड किनाऱ्याजवळ सोमवारी सकाळी एका मालवाहू जहाजाला लागलेल्या भीषण आगीने खळबळ उडाली. कोलंबोहून मुंबईच्या न्हावा-शेवा बंदराकडे येणाऱ्या या जहाजावर सुमारे ६५० कंटेनर होते. अचानक लागलेल्या आगीत सुमारे ५० कंटेनर समुद्रात कोसळले, तर २२ पैकी ४ क्रू मेंबर बेपत्ता झाले आहेत. ही घटना बेपोर-अझिक्कल बंदराच्या सुमारे ४० किमी अंतरावर घडली आहे. आगीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, सिंगापूरच्या मालकीचे असलेले हे जहाज कोलंबोहून ७ जून रोजी निघाले होते आणि १० जून रोजी एनपीसी मुंबई येथे पोहोचण्याची अपेक्षा होती. मात्र त्याआधीच सुमारे ३१५ किमी अंतरावर जहाजाच्या अंडरडेटकमध्ये स्फोट झाला आणि आगीने भीषण रूप धारण केले. या जहाजावर २२ क्रू मेंबर्स होते. अपघाताच्या वेळी १८ जणांनी समुद्रात उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला. त्यापैकी ४ जण भाजून गंभीर जखमी झाले असून, अन्य ४ जणांचा शोध सुरू आहे. दुर्घटनेनंतर भारतीय नौदलाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. कोची येथून तटरक्षक दलाच्या तीन इंटरसेप्टर बोटी रवाना करण्यात आल्या आणि बेपोर येथून अतिरिक्त पथक तैनात करण्यात आले आहे. नौदलाने डॉर्नियर हेलिकॉप्टरही घटनास्थळी पाठवले आहे.