Ahmedabad Plane Crash | विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार, टाटा ग्रुपकडून घोषणा

Ahmedabad Plane Crash

Ahmedabad Plane Crash | अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळलेल्या एअर इंडिया फ्लाइट 171 (Air India Flight 171) च्या भीषण अपघातात (Plane Crash) 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दशकभरातील हा जगातील सर्वात मोठा हवाई अपघात ठरला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना टाटा ग्रुपने (Tata Group) प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एका अधिकृत निवेदनात या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या अपघातात 200 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

“एअर इंडिया फ्लाइट 171 च्या दुखद घटनेमुळे आम्हाला खूप वेदना झाल्या आहेत. या क्षणी आम्ही अनुभवत असलेले दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि जखमी झालेल्यांसोबत आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत,” असे चंद्रशेखरन म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना टाटा ग्रुप प्रत्येकी ₹1 कोटींची मदत देईल. तसेच, जखमी झालेल्यांचा वैद्यकीय खर्चही आम्ही उचलू आणि त्यांना सर्व आवश्यक काळजी व मदत मिळेल याची खात्री करू.

स्थानिक समुदायाला पाठिंबा दर्शवण्यासाठी, टाटा ग्रुपने बी.जे. मेडिकल कॉलेजमधील वसतिगृह सुविधा (Hostel Facility) पुन्हा बांधण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या वसतिगृहावर विमान कोसळले होते. त्यावेळी अनेक विद्यार्थी या इमारतीत होते.

“याव्यतिरिक्त, आम्ही बी.जे. मेडिकलच्या वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठी मदत करू. या अकल्पनीय काळात बाधित कुटुंबे आणि समुदायांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत,” असे टाटा सन्सच्या अध्यक्षांनी नमूद केले.

एअर इंडियाने प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी दोन मदत विमानांची (Relief Flights) व्यवस्था केली आहे.

दरम्यान, क्रॅश झालेले एअर इंडिया फ्लाइट AI171, जे बोइंग 787-8 ड्रीमलाइनर प्रकारचे विमान होते आणि लंडन गॅटविकला जात होते, ते अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनउड्डाण केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत कोसळले. विमानात 230 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते.