भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशींचे निधन, 898 विकेट्स घेण्याची केली होती कामगिरी

Dilip Doshi

Dilip Doshi | भारताचे माजी डावखुरे फिरकीपटू दिलीप दोशी यांचे लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिशनसिंग बेदी यांच्या काळातही आपल्या अचूक फिरकीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दोशींच्या निधनाने भारतीय क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, प्रथम-श्रेणी क्रिकेटपटू मुलगा नयन आणि मुलगी विशाखा असा परिवार आहे.

क्रिकेट कारकीर्दीतील यश

दिलीप दोशी यांनी 1979 मध्ये बिशनसिंग बेदींच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 1983 पर्यंत 33 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 114 बळी घेतले, ज्यात 6 वेळा एका डावात 5 विकेट्सचा समावेश आहे. कारकिर्दीच्या पहिल्या तीन हंगामांत भारतात त्यांनी 28 कसोटी सामन्यांत 100 बळींचा टप्पा गाठला.

त्यांनी अचूक गोलंदाजी आणि ‘आर्म बॉल्स’मुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांना अडचणीत आणले होते.

https://twitter.com/BCCI/status/1937210755784540638/photo/1

मेलबर्न कसोटीतील ऐतिहासिक विजय

1981 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला, ज्यात दोशींची भूमिका महत्त्वाची होती. तुटलेल्या पायाच्या बोटाने गोलंदाजी करत त्यांनी भारताच्या विदयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दोशींनी भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल आणि सौराष्ट्रकडून खेळताना 898 प्रथम-श्रेणी विकेट्स घेतल्या, ज्यात 43 वेळा 5 बळींचा समावेश होता. इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये त्यांनी नॉटिंगहॅमशायर आणि वॉर्विकशायरकसाठी एक दशकाहून अधिक काळ खेळले. रणजी ट्रॉफीमध्ये बंगालसाठी ते महत्त्वाचे गोलंदाज होते. निवृत्तीनंतर ते लंडनमध्ये स्थायिक झाले होते व तेथेच व्यावसाय सुरू केला होता.