तेहरान- इराण-इस्रायल यांच्यात काल युद्धबंदी होण्याच्या आधी अमेरिकेने इराणच्या अणुतळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. या हल्ल्यानंतर या तळांवरील 400 किलो युरेनियम गायब झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
रविवारी पहाटे अमेरिकेच्या हवाईदलाने इराणच्या फर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे अणुतळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मात्र उपग्रहांकडून टिपण्यात आलेल्या छायाचित्रांत फर्डो आण्विक तळाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते. इस्फहान तळाचीही हल्ल्यात नासधूस झाली. पण या तळावर युरेनियमचा साठा अत्यल्प होता. तिसरा तळ नतान्झ अमेरिकन हल्ल्याच्या आधी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाला. या हल्ल्यानंतर अणुतळांवर असलेले 400 किलो युरेनियम कुठे गेले, असा प्रश्न विचारला जात आहे. युरेनियमच्या मदतीने जवळपास 10 अणुबॉम्ब तयार करता येतील असा अंदाज आहे. त्यामुळेच या युरेनियमचे काय झाले, या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतला जात आहे.
अमेरिकेने इराणमधील आण्विक तळांवर हल्ला करण्याच्या आधी फोर्डो आण्विक तळाच्या बाहेर ट्रकची रांग दिसून आली होती. यासंदर्भातील उपग्रह छायाचित्र व्हायरल झाली आहेत. हल्ल्यांनंतर हे ट्रक अचानक गायब झाल्यामुळे त्यातूनच युरेनियम हलवण्यात आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्रायलच्या संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या आणि संरक्षणविषयक तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, इराणने जवळपास साठ टक्के प्रक्रिया करून शुध्द केलेले 400 किलो एनरिच्ड युरेनियम अमेरिकन हल्ल्याच्या आधीच अन्यत्र हलवले आहे.
आंतरराष्ट्रीय अणुउर्ज संस्थेचे (आयएईए) प्रमुख राफेल ग्रोस्सी यांनी सांगितले की अमेरिकेने हल्ला करण्याच्या एक आठवडा आधी त्यांच्या पथकाने पाहणी केली असता इराणच्या आण्विक तळांवर युरेनियचा साठा होता. मात्र त्यांनी तो साठा गुप्त स्थळी सुरक्षित ठेवला असावा. पण हा साठा नेमका कुठे लपवण्यात आला हे सांगणे कठीण आहे. त्यामुळेच इराणकडे शाबूत असलेला युरेनियमचा हा साठा आता अमेरिकेच्या चिंतेचे कारण बनला आहे. बॉम्ब हल्ल्यात आण्विक तळांचे झालेले नुकसान काही महिन्यांत भरून काढणे इराणला शक्य आहे. त्यानंतर सुरक्षित राखलेल्या याच 400 किलो युरेनियमच्या साह्याने इराण आपला अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम पहिल्यासारखाच जोमाने सुरू करेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
