नागपूर – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० (Article 370)हटवण्याचा निर्णय देशात एकसंध संविधान लागू करण्यासाठी घेतला गेला, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ भूषण गवई (Chief Justice Dr. Bhushan Gavai)यांनी येथे व्यक्त केले. भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये (Nagpur)संविधान प्रास्ताविका पार्कचे उदघाटन (inauguration) व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. याप्रसंगी सरन्यायाधीश गवई बोलत होते.
संसदेने घेतलेला काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय आम्ही सर्वोच्च न्यायालयात सर्वानुमते योग्य ठरवला. देशात वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे संविधान चालणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. अमेरिकेत प्रत्येक राज्याची स्वतंत्र राज्यघटना आहे, त्यामुळे केवळ काही निवडक विषयांवरच केंद्र सरकारचे कायदे लागू होतात. मात्र भारतात संविधान रचताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, भारतासाठी एकच संविधान असले पाहिजे. देश एकसंध ठेवायचा असेल, तर एकसंघ संविधान आवश्यक आहे. याच मूलभूत विचारांवर आधारित हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि तो एकमताने मान्य केला, असे गवई म्हणाले.