Manoj Jarange : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाचे (Maratha reservation) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या बैठकीत आज अचानक मधमाश्यांचा हल्ला (Bees attack) झाल्याने मोठा गोंधळ उडाला. या प्रकारामुळे बैठक काही काळासाठी थांबवावी लागली. दरम्यान, मधमाश्यांनी हल्ला करताच समन्वयकांनी जरांगे पाटलांच्या अंगावर उपरणी टाकून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले.
मराठवाड्यातील निवडक समन्वयकांची अंतरवालीतील सरपंचांच्या शेतात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जरांगे पाटील आरक्षण चळवळीची पुढील दिशा आणि आगामी आंदोलनाची रणनीती यावर चर्चा करणार होते. सकाळपासूनच मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समन्वयक आणि गावोगावीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, चर्चा सुरू होण्याआधीच मधमाशांनी हल्ला केल्याने उपस्थितांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि लोकांची धावपळ सुरू झाली. नंतर बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले.
बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध करत नाही. सर्वांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावे. मंत्री छगन भुजबळांना काय करायचे ते करू द्या. जितका त्रास मराठ्यांना दिला जाणार तितके मराठे खोलात घुसतील. मराठ्यांनी कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. पण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध होत असेल तर मग मराठे पण त्याला उत्तर देणार. आंदोलनामागे राजकीय लोक असते, तर गोंधळ झाला असता.
हे देखील वाचा –
धनखड यांचा शासकीय घरात जीव गुदमरत होता; अभयसिंह चौटाला यांचा दावा
एच-१ बी व्हिसा फी वार्षिक नाही ! ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टीकरण