UPI Fraud: भारतातील डिजिटल व्यवहाराचा कणा असलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये वाढत्या फसवणुकीला (Payment Frauds) आळा घालण्यासाठी NPCI ने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून NPCI व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) व्यवहारांसाठी असलेली “कलेक्ट रिक्वेस्ट” किंवा “पुल ट्रान्झॅक्शन” (Collect Request/Pull Transaction) सुविधा पूर्णपणे बंद करणार आहे.
हा निर्णय UPI युजर्सची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट इकोसिस्टमवरील विश्वास कायम राखण्यासाठी घेण्यात आला आहे.
NPCI ने या निर्णयाद्वारे युजर्सच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत ‘कलेक्ट रिक्वेस्ट’मुळे फसवणूक करणारे लोक सहजपणे युजर्सच्या खात्यातून पैसे काढत होते. मात्र, आता ही सुविधा बंद झाल्यामुळे, UPI PIN वापरून पैसे वळते करण्याचे नियंत्रण पूर्णपणे पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीच्या हातात राहील.
‘कलेक्ट रिक्वेस्ट’ का बंद केली जात आहे?
‘कलेक्ट रिक्वेस्ट’ ही सुविधा सुरुवातीला पैशांच्या देवाणघेवाणीसाठी सोयीची वाटत होती. यात पैसे मागणारा दुसऱ्या व्यक्तीला रिक्वेस्ट पाठवतो आणि पैसे देणारा व्यक्ती UPI PIN टाकून पेमेंट मंजूर करतो. पण याच ‘पिन टाकून व्यवहार पूर्ण करण्याच्या’ नियमाचा गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला.
फसवणूक रोखण्यासाठी फीचर्स बंद
बनावट रिफंड/कॅशबॅक (Fake Refund/Cashback) योजना:
फसवणूक करणारे लोक ‘तुम्हाला रिफंड मिळेल’ असे सांगून, त्याऐवजी युजरला पैसे भरण्याची रिक्वेस्ट पाठवतात. अनेक युजर्स ‘पैसे येत आहेत’ या भ्रमात UPI PIN टाकून त्यांच्या खात्यातून पैसे गमावतात.
ऑनलाइन वस्तू खरेदी-विक्रीतील धोका:
ऑनलाइन वस्तू विकणाऱ्यांना खरेदीदार असल्याचे भासवून कलेक्ट रिक्वेस्ट पाठवली जाते. विक्रेत्याला वाटते की त्याला पेमेंट मिळाल्याची पुष्टी करायची आहे, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्या खात्यातून पैसे पाठवून देतो.
लॉटरी/बक्षीस जिंकल्याचे आमिष:
लॉटरी किंवा बक्षीस जिंकल्याचे खोटे आमिष दाखवून, ते बक्षीस मिळवण्यासाठी 1 किंवा10 रुपये ‘खाते पडताळणी’च्या नावाखाली कलेक्ट रिक्वेस्ट पाठवून युजरचा UPI PIN वापरतात. मात्र, आता ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ फीचर बंद झाल्यास अशाप्रकारे फसवणूक होणार नाही.
नवीन नियमांचा UPI युजर्सवर होणारा परिणाम
हा बदल 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल.P2P व्यवहारांमध्ये ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ बंद होईल. आता केवळ ‘पुश ट्रान्झॅक्शन’म्हणजे पैसे पाठवण्याची प्रक्रियाच करता येईल. यामुळे पैसे गमावण्याचा धोका कमी होईल.
भविष्यात UPI PIN चा वापर केवळ पैसे पाठवताना होईल, पैसे मिळवताना नाही. यामुळे फसवणुकीची शक्यता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
NPCI चा हा निर्णय डिजिटल इंडिया उपक्रमासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, यामुळे कोट्यवधी युजर्सच्या आर्थिक सुरक्षिततेला बळकटी मिळेल.
हे देखील वाचा – Sheetal Devi: शीतल देवीचा ‘सुवर्ण’ वेध! वर्ल्ड पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये विश्वविजेती बनून रचला इतिहास