Pollution In City : दरवर्षी दिवाळीत प्रदूषण अधिक वाढणे हि जणू प्रथा बनली आहे. वाऱ्यांची बदललेली स्थिती, आर्द्रता, सुरू असलेली बांधकामे, प्रकल्प आणि दिवाळीनिमित्त उडवले जाणारे फटाके यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांना रविवारपासून प्रदूषणाने विळखा घालायला सुरुवात केली.
आज दिवाळी निमित्त उडवले जाणारे फटाके यामुळे हवेची गुणवत्ता अधिक ढासळली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात देखील वाढत्या वायु प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता अति खराब नोंदवण्यात आली. प्रदूषणात भर पडत असताना, तापमानाचा पाराही ३५ अंशापार गेल्याने दिवाळीत गुलाबी थंडीची आस मात्र हवेत विरून जाताना दिसत आहे.
मुंबईतील हवेचा दर्जा रविवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला गेला तसेच आज सकाळपासूनच शहरातल्या वातावरणात प्रदूषणाने आक्रमण केले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे सकाळी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, पुणे परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक काल दुपारी ३०५ वर पोहोचला होता. वाकडमधील भूमकर चौकात ही नोंद करण्यात आली होती.
नागपूर शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १०० च्याही आत असतो.मात्र परंतु रविवारपासून नागपूरची हवा गुणवत्ता अधिकच ढासळत गेली. पुढील काही दिवस दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता आणखी घसरण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.
पावसाळ्यानंतर वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग देखील मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही शहरांच्या प्रदूषणात अधिक भर घालत आहेत.

पायाभूत सुविधा, रहिवासी आणि व्यावसायिक संकुल, नवे प्रकल्प यांची बांधकामे सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत त्यामुळे त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात आले. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये तसेच दिवाळीच्या फटाक्यांमुळे अतिसूक्ष्म काजळीसारखे कण एकत्र येऊन शहरे धुरकट करण्यास कारणीभूत ठरत आहेत.
प्रदूषणापासून काळजी कशी घ्यावी?
तज्ज्ञांच्या मते प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार उद्भवायाला सुरवात झाली आहे. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण हे अधिक जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेय, तेलकट पदार्थ खाणे वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा –
फक्त 55,000 रुपयांत TVS Sport बाइक; 70 किलोमीटरहून अधिक मायलेज