Vijay wadettiwar- राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया आज सुरू झाली. यानंतर पालिका निवडणुका होणार आहेत. यावेळी नाशिक आणि मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस एकट्याने लढणार आहे. आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar)आणि सचिन सावंत यांनी ही भूमिका जाहीर केली. मविआ आणि मनसे यांना काँग्रेस सोबत घेणार नाही.नाशिकमध्ये मविआचे स्थानिक नेते आणि मनसेचे नेते यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत निवडणुका एकत्र लढवण्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि सचिन सावंत यांनी मुंबई पालिका आणि नाशिक पालिका आम्ही स्वतंत्र लढणार आहोत असे स्पष्ट केले.
नाशिकमध्ये मविआ व मनसे नेत्यांनी एकत्रित घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे नेते दिनकर पाटील म्हणाले की, आज संयुक्त बैठक आयोजित करण्यामागे लोकशाही जिवंत ठेवणे हा उद्देश आहे. मतदार यादीतील घोळ, ओला दुष्काळ, कर्जमाफी यासाठी आम्ही लढतो आहोत. तर माकपचे नेते डॉ. डी. एल. कराड म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही सर्वांनी आगामी सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात येत्या निवडणुकांमध्ये महायुतीचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ही पत्रकार परिषद होताच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पोस्ट केली की, नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाने मनसेबरोबर जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाने स्थानिक नेते व पदाधिकार्यांना दिला आहे. त्यामुळे त्यात काही वाद होईल अशी परिस्थिती नाही. काँग्रेस व मनसे युतीबाबत महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस नेत्यांनी मिळून भूमिका स्पष्ट केली आहे. मविआमधील घटक पक्षांव्यतिरिक्त त्यांना या निवडणुकीत युती करायची असल्यास त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करावी. महायुतीचे घटक पक्ष भाजपा, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करायची नाही. मात्र वंचित, मनसे या पक्षांशी स्थानिक पातळीवर युती करण्यास हरकत नाही. परंतु मुंबई महानगरपालिकेत आम्ही स्वतंत्र लढायचे ठरवले आहे. त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही. आपण ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो त्यावेळेस कोणी कोणाला कमकुवत करण्यापेक्षा आपण कसे मजबूत होऊ? याचा विचार अधिक करण्याची गरज आहे. वरिष्ठांसोबत चर्चा केल्यावरच आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा करण्याचा निर्णय दिलेला आहे. उद्धव ठाकरे-मनसे संभाव्य युतीबाबत ते म्हणाले की, मित्रपक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा नक्की होईल. शरद पवार पक्षाकडून जर प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही चर्चा करू. ते मनसे सोबत युती करत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आला तर आम्ही स्थानिक नेत्यांकडे हा प्रस्ताव पाठवू आणि ते जे निर्णय घेतील त्यावर आम्ही पुढे जाऊ.
——————————————————————————————————————————————————









