Narayan Rane: २० वर्षांपूर्वी २००५ मध्ये नारायण राणे ( Narayan Rane) यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर झालेल्या दंगलीबाबत जे गुन्हे दाखल झाले त्याचा आता निकाल लागला . तेव्हा मुंबईच्या दादर परिसरात दोन राजकीय गटात हिंसाचार झाला. या प्रकरणात शिवसेनेतील (Shivsena) २९ नेते, कार्यकर्त्यांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. मुंबईतील विशेष खासदार-आमदार न्यायालयाने हा निकाल दिला.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेना नारायण राणे यांनी सोडली आणि त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर २४ जुलै २००५ रोजी दादरच्या जाखा देवी चौकात जमलेल्या जमावाने हिंसाचार केला होता. हिंसक जमावाने पोलीस, त्यांच्या गाड्या, बेस्ट बसवर दगडफेक केली होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच प्रकरणात विद्यमान खासदार रवींद्र वायकर, विद्यमान आमदार महेश सावंत यांच्यासह अन्य २७ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींमध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांचाही समावेश होता. याशिवाय अशोक केळकर, प्रवीण श्रीधर शेट्ये, ज्योती लक्ष्मण भोसले, स्वाती आत्माराम शिंदे, अजित कदम, स्नेहल सुधीर जाधव, प्रीती प्रवीण देवहारे, सुधा सुरेश मेहेर, श्रीधर जयवंत शेलार, दगडू हरिभाऊ सकपाळ आणि विशाखा शरद राऊत यांचीही नावे होती.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सर्व आरोपींना दोषमुक्त करताना एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, दोन राजकीय गटांमधील तीव्र राजकीय वैमनस्यामुळे संपूर्ण मुंबई शहराला धोका निर्माण झाला होता. शहराने पाहिलेला हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग असला तरी, या प्रकरणात आरोपींची ओळख प्रस्थापित झालेली नाही. आरोपी शिवसेनेचे सदस्य होते हे खरे असले तरी, ते दंगलीत सहभागी होते हे खात्रीने सिद्ध होत नसल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.
हे देखील वाचा –
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीसाठी केंद्र-राज्य सरकार कटिबद्ध ; फडणवीस यांचे आश्वासन
पालिकेचा मालमत्ता कर थकविण्यात सरकारी कार्यालये आघाडीवर
नक्की कोणते वक्तव्य शिस्त्र भंगकरणारे? ठोंबरेंचा पक्षाला सवाल









