Raj Thackeray BMC : आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीची रणधुमाळी जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण महोत्सवाच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुंबईच्या भविष्याबाबत अत्यंत गंभीर विधान केले आहे.
11 व्या कोकण महोत्सवात बोलताना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना गाफील न राहण्याची ताकीद दिली. त्यांनी स्पष्ट केले, “मराठी माणसांसाठी मी आज एकच गोष्ट सांगतो. येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटची महापालिकेची निवडणूक असेल.”
जर या निवडणुकीत निष्काळजीपणा दाखवला तर ती हातातून गेली म्हणून समजा, असे ते म्हणाले. या निवडणुकीनंतर मुंबईवर जे ‘थैमान’ सुरू होईल, ते कोणालाही आवरता येणार नाही, अशी थेट चिंता राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
मतदार याद्या आणि सध्याच्या राजकारणावर लक्ष ठेवण्याचे आदेश
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ‘रात्र वैऱ्याची आहे’ या शब्दांत सद्यस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनी मुंबईत सुरू असलेल्या राजकारणावर आणि विशेषत: मतदार याद्यांमधून सुरू असलेल्या राजकीय खेळावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.
“आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत आणि कोण खोटे आहेत, यावर देखील आपले लक्ष असणे गरजेचे आहे,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना जागरूक राहण्यास सांगितले. मनसे आणि महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी एकत्र येत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले होते.
युतीचे चित्र आणि राजकीय घडामोडी
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबतही चर्चांना उधाण आले आहे. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात युती होण्याची जोरदार शक्यता वर्तवली जात आहे, तसेच जागा वाटपावरही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
या संभाव्य युतीमुळे महाविकास आघाडीत राजकीय पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसने मनसेला सोबत घेण्यास ठामपणे विरोध केला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांनी लग्न का पुढे ढकलले? जाणून घ्या कारण









