Union Budget 2026 History and Facts : भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प ही केवळ एक आर्थिक आकडेवारी नसते, तर ती देशाच्या प्रगतीची रूपरेषा असते. यावर्षी देखील १ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील.
या मोठ्या दिवसापूर्वी भारतीय अर्थसंकल्पाशी जोडलेल्या काही ऐतिहासिक आणि रंजक गोष्टी जाणून घेणे रंजक ठरेल.
बजेटची वेळ संध्याकाळची सकाळी का झाली?
स्वातंत्र्यानंतर अनेक दशके भारताचा अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता मांडला जात असे. ही ब्रिटिशांनी सुरू केलेली परंपरा होती, कारण भारताची वेळ ब्रिटनच्या वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे. संध्याकाळी ५ वाजता बजेट मांडल्यामुळे लंडनमध्ये व्यावसायिक वेळेत माहिती पोहोचवणे सोपे जात असे.
मात्र, १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा मोडीत काढून बजेट मांडण्याची वेळ सकाळी ११ वाजता केली. पुढे २०१७ मध्ये मोदी सरकारने फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसाऐवजी १ फेब्रुवारी रोजी बजेट मांडण्याचा निर्णय घेतला.
पहिले बजेट कोणी मांडले?
भारताचे पहिले बजेट ७ एप्रिल १८६० रोजी ब्रिटिश राजवटीत जेम्स विल्सन यांनी मांडले होते. स्वतंत्र भारताचे पहिले बजेट २६ नोव्हेंबर १९४७ रोजी आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केले. फाळणीच्या संकटकाळात मांडलेले हे एक अंतरिम बजेट होते.
‘हलवा’ समारंभ आणि कमालीची गुप्तता
बजेट सादर होण्याच्या साधारण १० दिवस आधी अर्थमंत्रालयात हलवा समारंभ आयोजित केला जातो. हा समारंभ म्हणजे बजेटच्या छपाई प्रक्रियेची सुरुवात मानली जाते. एकदा का हा सोहळा झाला की, अर्थमंत्रालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी बाह्यजगाशी संपर्क तोडून नॉर्थ ब्लॉकच्या कार्यालयात ‘लॉक-इन’ होतात. बजेटची माहिती फुटू नये म्हणून ही कडक गुप्तता पाळली जाते.
ब्रीफकेस ते बहीखाता आणि डिजिटल बजेट
दशकानुदशके अर्थमंत्री लाल रंगाची ब्रीफकेस घेऊन संसदेत येत असत. २०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांनी ही वसाहतवादी परंपरा मोडीत काढली आणि लाल कापडात गुंडाळलेला ‘बहीखाता’ आणला. २०२१ मध्ये भारताने पहिले ‘पेपरलेस’ बजेट सादर केले. आता अर्थमंत्री टॅबलेटद्वारे बजेट वाचतात, जो एका बहीखाता शैलीतील पाऊचमध्ये ठेवलेला असतो.
सर्वात लांब भाषणाचा विक्रम
सर्वात लांब बजेट भाषण करण्याचा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे. २०२० मध्ये त्यांनी २ तास ४२ मिनिटे भाषण केले होते. या भाषणादरम्यान त्यांची प्रकृती थोडी बिघडली होती, त्यामुळे भाषणाची शेवटची दोन पाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वाचली होती.









