Sanjay Shirsat : राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असून, प्रचाराच्या सभांनी वातावरण तापले आहे. अशाच एका जाहीर सभेत भाषण करताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट कमालीचे भावूक झाले. काल माझ्यावर ओढवलेला मृत्यूचा प्रसंग केवळ नशिबाने टळला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या अपघाताचा भीषण अनुभव जनतेसमोर मांडला.
मर्सडीजचे दोन्ही टायर फुटले, थोडक्यात बचावले-
आपल्या प्रवासादरम्यान घडलेल्या दुर्घटनेची माहिती देताना शिरसाट म्हणाले की, “माणसाच्या आयुष्याचा काहीच भरवसा उरलेला नाही. काल माझ्यावरही काळाने झडप घातली होती, परंतु मी थोडक्यात बचावलो. प्रवासात असताना माझी गाडी एका मोठ्या खड्ड्यात आदळली आणि गाडीच्या डाव्या बाजूचे दोन्ही टायर एकाच वेळी फुटले (बर्स्ट झाले). ती काही साधीसुधी गाडी नव्हती, तर अत्यंत सुरक्षित मानली जाणारी ‘मर्सडीज’ कार होती. तरीही हा अपघात इतका भीषण होता की, थोडा वेळ जरी चुकला असता, तर आज तुम्ही मला श्रद्धांजली वाहत बसला असता.” अपघाताची तीव्रता इतकी होती की, ती गाडी अद्याप दुरुस्त होऊन घरी परतलेली नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आयुष्याच्या अनिश्चिततेवर भाष्य-
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी अजित पवार यांच्या निधनाचा संदर्भ देत उपस्थितांना अंतर्मुख केले. “अजितदादा आपल्यातून जातील असे कोणाला स्वप्नात तरी वाटले होते का? माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर आहे, याचा प्रत्यय मला काल आला. तुम्हाला नशिबाने जे आयुष्य मिळाले आहे, त्यावरच आपण जिवंत आहोत. म्हणूनच मी नेहमी सांगतो की, उद्याची चिंता करण्यापेक्षा आजचा दिवस आनंदात आणि चांगल्या कामात घालवा,” असा मौलिक सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
उमेदवारांना दिला धीर-
अपघाताच्या या थरारानंतरही शिरसाट यांनी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना धीर दिला. “आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मनापासून काम करा,” असे आवाहन करत त्यांनी निवडणुकीच्या वातावरणात चैतन्य भरले.











