Bharat Vistaar AI: भारतीय शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘भारत-विस्तार’ या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सुविधेचा शुभारंभ केला.
जयपूरमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत हे व्यासपीठ शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू झाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पात या सुविधेची घोषणा केली होती.
काय आहे ‘भारत-विस्तार’ (Bharat-Vistaar)?
हे एक बहुभाषिक एआय टूल असून जे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत शेतीविषयक सल्ला, सरकारी योजना आणि बाजारभावाची माहिती देते. यामध्ये ‘भारती’ नावाचे व्हॉईस असिस्टंट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. यासाठी सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
शेतकऱ्यांना काय फायदा होणार?
- एका कॉलवर माहिती: शेतकरी १५५२६१ हा क्रमांक डायल करून २४ तास माहिती मिळवू शकतात.
- १० महत्त्वाच्या योजना: यामध्ये पीएम-किसान, पीक विमा योजना, सॉईल हेल्थ कार्ड आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या १० प्रमुख केंद्रीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल.
- हवामान आणि किडीचा इशारा: पिकांवरील संभाव्य कीड आणि बदलत्या हवामानाचे अलर्ट थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर दिले जातील.
- २२ प्रादेशिक भाषा: हे व्यासपीठ २२ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. सुरुवातीला ही सेवा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजरातीसह काही राज्यांमध्ये सुरू होईल.
कसे काम करणार हे तंत्रज्ञान?
भारत-विस्तार हे ‘ॲग्रीस्टॅक’ आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्या माहितीशी जोडलेले आहे. वधवानी एआय या संस्थेने विकसित केलेला चॅटबॉट शेतकऱ्यांना ‘किसान कॉल सेंटर’शी थेट जोडतो. यामुळे शेतकऱ्यांना विविध कार्यालयांच्या चकरा मारण्याची किंवा मध्यस्थांवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. पहिल्या टप्प्यात हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असलेली ही सेवा येत्या ३ महिन्यांत तमिळ, बंगाली आणि कन्नडमध्येही विस्तारली जाणार आहे.
या एआय प्लॅटफॉर्ममुळे शेतीमध्ये अचूकता येईल, संसाधनांचा योग्य वापर होईल आणि उत्पादन वाढण्यास मदत होईल, असा विश्वास कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.











