Summer Weather Forecast 2026: भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या उन्हाळ्याबाबत चिंताजनक अंदाज वर्तवला आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
विशेषतः दक्षिण भारताची पूर्व किनारपट्टी वगळता उर्वरित देशात उन्हाचा कडाका तीव्र जाणवेल. यंदा उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही वाढणार असून नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.
फेब्रुवारी ठरला तिसऱ्या क्रमांकाचा उष्ण महिना
यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली होती. आकडेवारीनुसार, 1901 सालापासूनच्या नोंदींमध्ये यंदाचा फेब्रुवारी हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. या महिन्यात देशाचे सरासरी कमाल तापमान 28.78 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा 1.07 अंशांनी जास्त होते. तसेच, फेब्रुवारीत पावसानेही पाठ फिरवली. सरासरी 22.7 मिमी पावसाच्या तुलनेत केवळ 4.2 मिमी पाऊस पडला, म्हणजेच तब्बल 81.3 टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे.
उष्णतेच्या लाटा आणि प्रादेशिक परिणाम
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रभाव सर्वाधिक राहील. साधारणपणे 12 ते 15 दिवस कडक उष्णतेची लाट राहू शकते. उत्तर भारतात यंदा थंडीचे झोत (Western Disturbances) सक्रिय असूनही त्यांचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम झाला नाही, त्यामुळे राज्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर थंडी गायब होऊन चटके जाणवू लागले.
विदर्भात पावसाची शक्यता आणि एल निनोची स्थिती
मार्च महिन्यात देशात सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मार्चमध्ये पावसाची सरासरी गाठली जाऊ शकते. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ची स्थिती सध्या तटस्थ असून, जुलै ते सप्टेंबर दरम्यान ती पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला दमदार पावसाची शक्यता असली, तरी हवामान विभागाने अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही.
हे देखील वाचा – Crude Oil Price Hike: युद्धाचा फटका सामान्यांना! पेट्रोल आणि डिझेलचे दर 200 रुपयांच्या पार जाणार का? जाणून घ्या










