Weather Update : राज्यात उन्हाळा अधिकच प्रखर होऊ लागला असून, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पारा चाळीस अंशांच्या वर पोहोचला आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा येथील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्याने दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानाचा आलेख आणखी चढता राहणार आहे.
विदर्भात सर्वाधिक उष्णता
विदर्भातील अकोला हे शहर राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले असून, तेथे ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पाठोपाठ अमरावतीमध्ये ४०.६ आणि वर्धा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस तापमान मोजले गेले. मार्चच्या सुरुवातीलाच विदर्भातील ही परिस्थिती आगामी उन्हाळ्याच्या तीव्रतेची चाहूल देत आहे.
राज्यातील अन्य शहरांची स्थिती
विदर्भासोबतच राज्यातील इतर भागांतही उन्हाचा तडाखा वाढला आहे. सोलापूरमध्ये ३९.६ आणि वाशिममध्ये ३९.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, जळगाव आणि यवतमाळ यांसारख्या शहरांतही उष्णतेचा दाह जाणवू लागला आहे. कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये मात्र हवामान तुलनेने सुसह्य आहे.
तज्ज्ञांचा इशारा
वाढते शहरीकरण, वृक्षतोड आणि प्रदूषण यांमुळे पृथ्वीच्या वातावरणात वेगाने बदल होत आहेत. हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांच्या मते, यंदाचा उन्हाळा मागील सर्व विक्रम मोडीत काढू शकतो. जागतिक हवामान धोक्याच्या निर्देशांकात भारत नवव्या क्रमांकावर असून, पुढील काही वर्षे जागतिक तापमानासाठी अत्यंत आव्हानात्मक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शहरांनुसार कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):
महाबळेश्वर: ३०.७
अकोला: ४०.८
अमरावती: ४०.६
वर्धा: ४०
सोलापूर: ३९.६
वाशिम: ३९.२
पुणे: ३८.५
जळगाव: ३८.५
यवतमाळ: ३८.४
सांगली: ३८.३
छत्रपती संभाजीनगर: ३८.२
परभणी: ३८.१
मालेगाव: ३८.१
नागपूर: ३७.८
बुलढाणा: ३७.२
नाशिक: ३७
धाराशिव: ३७
गोंदिया: ३६.६
कोल्हापूर: ३०.७










