Sharad Pawar : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी झालेली निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून, सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पवार घराण्यातील दोन पिढ्या एकाच वेळी वरिष्ठ सभागृहात पाऊल ठेवणार आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार तर महायुतीच्या वतीने अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. या विजयानंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे आभार मानण्यासाठी आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा करण्यासाठी एका विशेष स्नेहभोजनाचे (डिनर डिप्लोमसी) आयोजन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी सोमवारी, २३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना निमंत्रित केले आहे. आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असला, तरी राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या ‘डिनर डिप्लोमसी’मध्ये कोणती खलबतं रंगणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. या स्नेहभोजनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये समन्वय अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
राज्यसभेवर फेरनिवड झाल्यानंतर शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचे आणि मित्रपक्षांचे आभार मानले आहेत. “१९६७ मध्ये विधानसभा सदस्य म्हणून सुरू झालेला माझा संसदीय प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. जनतेने दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या पाठिंब्यामुळेच ही सेवा करणे मला शक्य झाले,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. राज्याचे मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडताना मिळालेले यश हे जनतेच्या आशीर्वादाचेच फळ असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
पवार घराण्यातील या ऐतिहासिक विजयामुळे संसदेत आता आजोबा आणि नातू एकत्र दिसणार आहेत. एकीकडे शरद पवारांचा दांडगा अनुभव आणि दुसरीकडे पार्थ पवारांचे तरुण नेतृत्व, अशा दोन भिन्न विचारधारांचे प्रतिनिधी एकाच कुटुंबातून राज्यसभेवर गेल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.










