Supriya Sule on Devendra Fadnavis : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विकृत कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणातील तपासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले. “अशोक खरातसारख्या विकृत प्रवृत्तीला मुख्यमंत्री पाठीशी घालणार नाहीत, असा मला विश्वास आहे,” असे सांगत त्यांनी या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.
दाभोलकरांचा वारसा आणि पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा-
खासदार सुळे यांनी यावेळी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानाचा उल्लेख करत म्हटले की, अंधश्रद्धेविरुद्ध लढा देताना दाभोलकरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाभोलकरांचा तोच वारसा पुढे नेत आहेत, ही समाधानाची बाब आहे. खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. संसदेतही इतर राज्यांतील खासदार मला महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न विचारत आहेत. समाज म्हणून आपण अशा प्रवृत्तींना रोखण्यात कमी पडलो आहोत, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी प्रांजळपणे मान्य केले.
नेत्यांसोबतचे फोटो आणि नैतिक जबाबदारी-
अशोक खरात याचे अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो समोर येत असल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक लोक आमच्यासोबत फोटो काढतात, मात्र त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे किंवा तिचे चारित्र्य कसे आहे, याची कल्पना आम्हाला नसते. जर खरातच्या या गलिच्छ कृत्यांची आधी पुसटशीही कल्पना असती, तर कोणीही त्याला जवळ केले नसते. मात्र, इथून पुढे कोणासोबतही छायाचित्र काढताना आम्हाला दहावेळा विचार करावा लागेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी रूपाली चाकणकर यांच्या संदर्भातील वादावर भाष्य करताना, हा प्रश्न त्यांच्या संबंधित पक्षाला विचारला पाहिजे, असे सूचक विधान केले.
सातारा जिल्हा परिषद राडा: लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप-
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाचाही सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. साताऱ्यात घडलेला प्रकार हा लोकशाहीची हत्या करणारा असल्याची टीका त्यांनी केली. विशेष म्हणजे, फडणवीस सरकारचा भाग असलेल्या दोन कॅबिनेट मंत्र्यांनाच पोलिसांकडून धक्काबुक्की केली जाते, हे सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही. यामागे कोणती ‘अदृश्य शक्ती’ आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून, साताऱ्याची ही निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पक्षफोडाफोडीच्या राजकारणावर टीका-
शेवटी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष फोडण्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “शून्यातून पक्ष उभा करणे ही शरद पवारांची चूक होती का?” असा भावनिक प्रश्न त्यांनी विचारला.










