Pratap Sarnaik : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून, ‘ऑपरेशन टायगर’ या मोहिमेची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यामागून हालचाली करत असल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी रात्री ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे गटाच्या आठ खासदारांमध्ये एक गुप्त बैठक पार पडल्याचे वृत्त धडकल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली परखड भूमिका मांडत ठाकरे गटातील अंतर्गत असंतोषाचा पाढा वाचला आहे.
ठाकरे गटात खदखद आणि वाळीत टाकल्याची भावना-
प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटातील आमदार आणि खासदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, “आम्ही जेव्हा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी फिरत होतो, तेव्हा ठाकरे गटातील अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे आपली व्यथा मांडली होती. पक्षनेतृत्वाकडून सहकार्य मिळत नसल्याने आणि आपल्याला वाळीत टाकल्यासारखी वागणूक मिळत असल्याने अनेक नेते नाराज आहेत.” हाच असंतोष आता वेगवेगळ्या माध्यमांतून बाहेर पडत असून, अनेक लोक रोजच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले.
गुप्त बैठका आणि अंतर्गत युद्धाचे संकेत-
ठाणे येथे झालेल्या कथित गुप्त बैठकीचा संदर्भ देत सरनाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे हे छुप्या पद्धतीने काम करणारे नेते नाहीत; त्यांना जर बैठका घ्यायच्या असतील तर त्या उघडपणे घेतील. मात्र, ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येत आहेत. अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत घेतलेली भूमिका आणि त्यातून समोर आलेली नावे पाहता, या गटात परस्पर अविश्वासाचे वातावरण असल्याचे स्पष्ट होते. “पक्षात भीतीचे वातावरण निर्माण करून स्वतःची ताकद टिकवून ठेवण्यासाठी कोणाकडून तरी या बातम्या पसरवल्या जात असाव्यात,” असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
काय आहे ‘ऑपरेशन टायगर’?
‘ऑपरेशन टायगर’ हे केवळ खासदार फोडण्यापुरते मर्यादित नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, हे ऑपरेशन ३६५ दिवस आणि २४ तास सुरू असते. ज्या शिवसैनिकावर अन्याय झाला आहे किंवा ज्याला बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे विचार पटतात, त्या प्रत्येकासाठी हे द्वार उघडे आहे. आमच्या दृष्टीने खासदार असो वा सर्वसामान्य कार्यकर्ता, दोघांचेही महत्त्व समान आहे. बाळासाहेबांच्या मूळ विचारांशी नाते सांगणाऱ्या प्रत्येकाचे पक्षात स्वागतच केले जाईल, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
भाजपच्या हस्तक्षेपाचा इन्कार-
दिल्लीतील भाजप नेतृत्वाने हे ‘ऑपरेशन’ थांबवण्यास सांगितले असल्याच्या चर्चेचा प्रताप सरनाईक यांनी स्पष्टपणे इन्कार केला. ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आमच्या पक्षांतर्गत निर्णयांमध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही. शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष असून पक्षाचे सर्व धोरणात्मक निर्णय एकनाथ शिंदे हे स्वतः घेतात.असे ते म्हणाले.










