Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात प्रकरणात तपासादरम्यान नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. खरातने पुणे, शिर्डी आणि नाशिकनंतर आता सोलापुरातही त्याने कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे उघड झाले आहे. प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातील गट क्रमांक २००/१ मधील सुमारे ४.४८ हेक्टर (अंदाजे ११ एकर) जमीन खरातने स्वतःच्या नावावर घेतली आहे. २८ मार्च २०२४ रोजी झालेल्या या व्यवहाराची किंमत २ कोटी ४० लाख ९१ हजार २०० रुपये इतकी असल्याची माहिती आहे. या व्यवहारात त्याची पत्नी कल्पना खरात हिला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आले होते. कळमण परिसरात जमिनीचे बाजारभाव साधारण ५ ते ६ लाख रुपये प्रति एकर असताना खरातने तब्बल २१ ते २२ लाख रुपये प्रति एकर दराने जमीन खरेदी केल्याचे नोंदीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी महामार्ग प्रकल्पाची माहिती आधीच मिळवूनच ही गुंतवणूक करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक तपासात या वस्तूंचा वापर करून महिलांवर दबाव टाकला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, अत्याचाराच्या प्रयत्नांशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावेही हाती लागले असून, ते न्यायालयीन प्रक्रियेत निर्णायक ठरू शकतात. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून नाशिक, सिन्नर आणि शिर्डी परिसरात खरातविरोधात एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ८ गुन्हे लैंगिक अत्याचाराशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, विशेष तपास पथकाने खरातच्या कार्यालयाची पुन्हा झडती घेत महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. झडतीदरम्यान विशिष्ट प्रकारच्या औषधाच्या बाटल्या, कुजलेले पेढे आणि सॅनिटायझरच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. न्यायवैद्यक अहवालानुसार या वस्तूंवर आणि कार्यालयातील केबिनच्या दरवाजाच्या आतील कडीवर खरातचे हातांचे ठसे आढळले असून, पीडित महिलांचे ठसे आढळले नसल्याची माहिती आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कोठडी उद्या संपत आहे. त्यामुळे आता त्याला पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत.
दुसरीकडे, अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार आहे. गेल्या १० दिवसांपासून पोलिस तिचा शोध घेत आहेत. पण अद्याप ती हाती लागली नाही. पोलिसांनी या प्रकरणी कल्पना खारातच्या माहेरी जाऊन विचारपूस केली. तसेच तिच्या नातलगांचीही झाडाझडती घेतली. पण तिचा कोणताही थांगपत्ता अजून लागला नाही. त्यामुळे फरार कल्पना कुठे आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
फडणवीसांना शिकारीचा छंद ; टप्प्यात आली की बार उडवणार- राऊत
राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ‘भोंदू खरात बाबा’ प्रकरणावर उबाठा खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सूचक विधान केले. ते म्हणाले की, हे प्रकरण साधे नसून याला मोठे राजकीय अँगल आहेत. या प्रकरणाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अनेक नेत्यांची शिकार केली जाणार आहे. राजकीय बळी घेणे हा देवेंद्र फडणवीस यांचा छंद आहे. सुधाकरराव नाईक यांचे एक प्रसिद्ध वाक्य होते की ’शिकार टप्प्यात आली की बार उडवायचा. फडणवीस जरी सुधाकरराव नाईक नसले, तरी त्यांना अशा प्रकारच्या शिकारीचा नाद नक्कीच आहे. आता खरातच्या माध्यमातून आपोआप अनेकांचे बळी जातील.
ते पुढे म्हणाले की, खरात बाबाच्या प्रकरणात कोण किती मिनिटे कोणाशी बोलले, ही अत्यंत गोपनीय माहिती असते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या मदतीने ही माहिती बाहेर आली. गृहमंत्रालय किंवा मुख्यमंत्री त्यांच्या मदतीशिवाय सीडीआर तुम्हाला मिळू शकणार नाही. कोणाला तरी जाणीवपूर्वक ही माहिती बाहेर काढायची आहे. त्यामुळे हे सत्य आहे की, खरात बाबाच्या माध्यमातून अनेक गोष्टी उघड केल्या जातील.
हे देखील वाचा –











