Ajit Pawar accident- राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल करून घेत नव्हते. म्हणून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कर्नाटकात बंगळुरूमध्ये जाऊन तिथे गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र सीआयडीकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सीआयडी हा तपास गुंडाळणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी आ. रोहित पवार यांनी आधी मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणि नंतर बारामती पोलीस ठाण्यात हेलिकॉप्टरच्या व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला नाही. रोहित पवार यांनी 25 मार्च रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात झीरो एफआयआर दाखल केला होता. गुन्हा घडलेल्या पोलीस ठाण्याऐवजी इतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला जातो, त्याला झीरो एफआयआर म्हणतात.
या एफआयआरला तात्पुरता शून्य क्रमांक दिला जातो. नंतर हा गुन्हा संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जातो. रोहित पवार यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात हा झीरो एफआरआय दाखल करून त्यात अपघाताबाबत अनेक संशयास्पद मुद्दे नमूद केले होते. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पाच दिवसांपूर्वी हा एफआयआर बारामती पोलीस ठाण्याकडे देण्यात आला होता.
मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आता राज्य शासनाने हा एफआयआर सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणी नोंदवलेले जबाब आणि गोळा केलेले पुरावे आता सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले आहेत. कर्नाटक पोलिसांकडून नवी माहिती मिळाल्यास सीआयडीला ती उपयुक्त ठरणार आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या व्हीएसआर कंपनीच्या विमानांबाबत आ. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी दावा केला की, व्हीएसआर कंपनीची बहुतांश विमाने तांत्रिकदृष्ट्या सदोष असून त्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ही विमाने उड्डाणासाठी धोकादायक असल्याने कंपनीचे वैमानिक आणि विमान कर्मचारी यांनादेखील अपघाताची भीती वाटत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या कंपनीच्या बैठकीत वैमानिक आणि इतर कर्मचाऱ्यांनी सदोष विमानात विमानात बसण्याची भीती बोलून दाखवली. परंतु सरकारमधील काही लोकांचा वरदहस्त असल्याने ‘सरकार आपल्या पाठीशी आहे, घाबरू नका’ असा शाब्दिक धीर त्यांना देण्यात आला. पण दुर्दैवाने अपघात झाला तर व्यवस्थापनाने त्यांना दिलेल्या या शाब्दिक धीराने त्यांचा जीव वाचणार आहे का? एकीकडे अजितदादांच्या अपघातानंतर महाराष्ट्र सरकारने व्हीएसआर कंपनीची 80 कोटींची बिले अदा केली. दुसरीकडे कंपनीवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.










