Punjab Kings Playoff : आयपीएल २०२६ च्या हंगामाची अत्यंत दिमाखात सुरुवात करणाऱ्या पंजाब किंग्सच्या (PBKS) अडचणी आता वाढताना दिसत आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला ज्या संघाने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, तोच संघ आता प्लेऑफच्या शर्यतीत संघर्ष करताना दिसत आहे. सोमवारी धर्मशाला येथे पार पडलेल्या अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाबचा ३ गडी राखून पराभव केला. हा पराभव पंजाबसाठी मोठा धक्का मानला जात असून, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघावर आता स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
पराभवाचा ‘चौकार’ आणि गुणतालिकेतील घसरगुंडी-
हंगामाच्या सुरुवातीला सलग विजय मिळवणाऱ्या पंजाब किंग्सच्या कामगिरीचा आलेख अचानक खाली घसरला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या पराभवानंतर संघाची लय पूर्णपणे विस्कळीत झाली. राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि आता दिल्ली कॅपिटल्स अशा बलाढ्य संघांकडून पंजाबला सलग चार सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. ५५ व्या सामन्यातील या पराभवामुळे संघाच्या मानसिकतेवर आणि गुणांच्या गणितावर मोठा परिणाम झाला आहे.
गुणतालिकेची सद्यस्थिती आणि नेट रनरेट-
सलग चार पराभव होऊनही, नशिबाची साथ आणि सुरुवातीच्या चांगल्या कामगिरीमुळे पंजाब किंग्स सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर तग धरून आहे. पंजाबने आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यापैकी ६ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर ४ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. एका सामन्याचा निकाल पावसामुळे लागला नाही, परिणामी संघाच्या खात्यात १३ गुण जमा आहेत. सध्या पंजाबचा नेट रनरेट +०.४२८ असून तो इतर प्रतिस्पर्धी संघांच्या तुलनेत समाधानकारक आहे, हीच त्यांच्यासाठी एकमेव जमेची बाजू ठरली आहे.
प्लेऑफसाठी विजयाची त्रिसूत्री अनिवार्य-
पंजाब किंग्सचा पुढील प्रवास आता ‘करा अथवा मरा’ या वळणावर येऊन ठेपला आहे. प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी पंजाबला उर्वरित ३ सामन्यांपैकी किमान २ सामने जिंकणे अनिवार्य आहे. गुणतालिकेतील अव्वल तीन संघांकडे आधीच १४ गुण असल्यामुळे, अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी किमान १६ ते १७ गुणांची आवश्यकता भासणार आहे.










