Nashik Neet Paper Leak : वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘NEET (UG) 2026’ परीक्षा यंदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नाशिक आणि पुणे येथील कारवायांच्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले असून, लातूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. एका पालकाने केलेल्या तक्रारीनंतर लातूरमधील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून काही खासगी प्रशिक्षण संस्थांची (कोचिंग क्लासेस) अत्यंत गुप्तपणे चौकशी केली जात आहे.
पालकांचा धक्कादायक दावा: प्रत्यक्ष परीक्षेशी मिळतेजुळते प्रश्न
या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती १२ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालेल्या एका लेखी तक्रारीमुळे. एका विद्यार्थिनीच्या पालकांनी असा खळबळजनक दावा केला आहे की, लातूरमधील एका नामांकित खासगी क्लासेसने परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची जी ‘मॉक टेस्ट’ (सराव परीक्षा) घेतली होती, त्यातील तब्बल ४२ प्रश्न मुख्य नीट परीक्षेत जसेच्या तसे विचारण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रश्न जुळणे हा केवळ योगायोग नसून, पेपर आधीच फुटल्याचा हा सबळ पुरावा असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समरजीत साळवे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे.
पोलिसांची गुप्त चौकशी आणि सीसीटीव्ही तपासणी:
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी संबंधित क्लासेसच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. बुधवारी पहाटे दोन संशयितांची आणि त्यानंतर अन्य दोघांची कसून चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत चार जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून, क्लासेसने काढलेली प्रश्नपत्रिका आणि मूळ प्रश्नपत्रिका यांचा तांत्रिक अभ्यास केला जात आहे. तपासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलिसांनी ही संपूर्ण प्रक्रिया कमालीच्या गुप्ततेत सुरू ठेवली आहे.
नाशिकचा मास्टरमाईंड ‘सीबीआय’च्या ताब्यात:
दरम्यान, या प्रकरणाचे ‘नाशिक कनेक्शन’ही स्पष्ट झाले आहे. ३० वर्षीय शुभम खैरनार याला पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले असून, त्याने १५ लाख रुपयांना या पेपरचा व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता ‘केंद्रीय अन्वेषण विभागाने’ (CBI) तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. शुभम खैरनारला पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात येणार असून, आंतरराज्यीय रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
परीक्षा रद्द: २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेला देशभरातून २२ लाख, तर महाराष्ट्रातून अडीच लाख विद्यार्थी बसले होते. मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वी ४२ तास आधीच पेपर फुटल्याच्या आरोपांची सत्यता पडताळल्यानंतर, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे आणि चिंतेचे वातावरण आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले असून, संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात या गैरव्यवहारामुळे खळबळ उडाली आहे.











