Modi-Shah are traitors! Rahul Gandhi Slammed – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. मध्य पूर्वेतील युद्धामुळे देशवासीय संकटाचा सामना करत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये चॉकलेट वाटत फिरत आहेत, सेल्फी काढत आहेत, व्हिडिओ रिल बनवत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. पुढे जाऊन राहुल गांधी यांनी मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना थेट गद्दार म्हटले. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपाने पलटवार केला. राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातील राहू आहेत, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन म्हणाले.
राहुल गांधी आज उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि अमेठी मतदारसंघांच्या दौर्यावर आले होते. रायबरेलीच्या धुलवारी गावात वीरा पासी यांच्या मूर्तीचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांसमोर त्यांनी त्वेषाने भाषण केले. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तुमच्याकडे येतील तेव्हा ते तुमच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल बढाया मारतील.
तेव्हा त्यांच्या तोंडावर सांगा की तुमचे पंतप्रधान मोदी गद्दार आहेत, तुमचे गृहमंत्री अमित शहा गद्दार आहेत, तुमची संघटना गद्दार आहे, तुम्ही देश विकण्याचे पाप केले आहे. तुम्ही देशाच्या राज्य घटनेवर हल्ला केला आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही गांधीजींवर हल्ला केला आहे.
मोदी तुम्हाला सांगतात पेट्रोल-डिझेलचा कमीत कमी वापर करा, एक वर्षभर सोने खरेदी करू नका, परदेश प्रवास करू नका आणि दुसर्याच दिवशी स्वतः महागड्या परदेश दौर्यावर हजारो कोटी रुपयांच्या विमानात बसून निघून जातात. मी पुन्हा सांगतो, मोदींनी देशाची अर्थव्यवस्थाच विकली आहे. अदानी, अंबानी आणि अमेरिकेच्या हाती भारताची अर्थव्यवस्था मोदींनी सोपवली आहे.
येत्या दोन-तीन महिन्यांत महागाईचा असा झंझावात सुरू होईल की तुम्हा सर्वांना त्याचा जबरदस्त फटका बसेल. तेव्हा मोदी तुम्हाला सांगतील की यात माझी काही चूक नाही.कोविड काळात मोदींनी असेच तुमच्यासमोर नाटक केले होते.पण मी तुम्हाला सांगतो की, दोष पूर्णपणे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आरएसएसचा आहे. कारण त्यांनी संविधान नष्ट करण्याचे पाप केले आहे.
राहुल गांधी यांच्या या भाषणाचा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा अध्यक्ष नितीन नबीन म्हणाले की, राहुल गांधींचे हे वक्तव्य भारतीय राजकारणातील शुचिता आणि एकमेकांचा आदर राखण्याच्या परंपरेला छेद देणारे आहे. निवडणुकांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवामुळे आलेले नैराश्य राहुल गांधींच्या बोलण्या-वागण्यातून स्पष्ट दिसते. राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातील राहू आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेप घेतला. राहुल गांधी यांच्याबद्दल मी याआधी बोललो होतो. पण त्यावेळी शरद पवारांना माझे बोलणे आवडले नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा योग्य नाही, असे पवार म्हणाले होते. पण मी आज पुन्हा एकदा सांगतो, राहुल गांधी हा देशाच्या राजकारणातला रिजेक्टेड माल आहे, असे फडणवीस म्हणाले.










