Palkhi Schedule 2026: मान्सूनच्या पहिल्या पावसाची सर जमिनीवर पडताच महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाचे वेध लागतात. विठ्ठल भेटीची ओढ आणि आषाढी वारीची उत्सुकता यामुळे संपूर्ण राज्यात आता भक्तीमय वातावरण तयार होऊ लागले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे लाखो विठ्ठल भक्त, हजारो दिंड्या आणि मानाच्या पालख्यांनी आतापासूनच आपल्या प्रवासाचे नियोजन सुरू केले आहे.
यंदा आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे.
Palkhi Schedule 2026: ७ जुलै रोजी देहू नगरीतून निघणार तुकोबांची पालखी
संत तुकाराम महाराज यांच्या 341 व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवार, 7 जुलै 2026 रोजी (जेष्ठ वद्य सप्तमी) श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य देऊळवाड्यातून तुकोबारायांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’ च्या नामस्मरणात हा सोहळा देहूतून प्रस्थान करेल.
या वर्षीच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणून खालील ३ जणांची निवड करण्यात आली आहे:
- ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे
- ह.भ.प. उमेश सुरेश मोरे
- ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे
विशेष म्हणजे, यंदा पालखी रथ आणि चौघडा गाडी ओढण्यासाठी संस्थानच्या वतीने 3 नवीन बैलजोड्यांची खरेदी करण्यात आली असून, त्या पहिल्यांदाच या सोहळ्यात सहभागी होतील. तुकोबांच्या पालखीसोबतच, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून कधी प्रस्थान होणार, याकडेही आता समस्त वारकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.
Palakhi Schedule 2026: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघणार पालख्यांचा मेळा
आषाढी एकादशीच्या निमित्ताने केवळ पुणे किंवा परिसरातूनच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून संतांच्या पालख्या पंढरीकडे रवाना होतात. यामध्ये खालील मुख्य पालख्यांचा समावेश असतो:
- संत गजानन महाराज पालखी: बुलढाण्यातील शेगाव येथून संत गजानन महाराजांची पालखी पायी प्रवासासाठी निघते. या सोहळ्यात हत्ती, घोडे आणि शिस्तीत चालणारे शेकडो वारकरी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात.
- संत मुक्ताई पालखी: जळगाव जिल्ह्यातून आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या पालखीचेही पंढरपूरसाठी प्रस्थान होते.
हे सर्व वारकरी ‘माऊली माऊली’चा गजर करत शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीत चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येतात. आपल्या लाडक्या विठुरायाचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी लाखो भाविकांच्या रांगा पंढरपुरात पाहायला मिळतात.
हे देखील वाचा – West Bengal Political Crisis: बंगालमध्ये ‘ठाकरे-शिंदे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? तृणमूलच्या 60 आमदारांच्या बंडामुळे ममता बॅनर्जी अडचणीत









