Lucknow Coaching Fire: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लखनऊमधील अलीगंज परिसरातील एका तीन मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे नगरविकास आणि ऊर्जा मंत्री ए. के. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या एसी (AC) डक्टमधून या आगीची सुरुवात झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
इमारतीमध्ये आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्यासाठी कोणताही योग्य मार्ग (एक्झिट रूट) उपलब्ध नव्हता. त्यामुळे आग लागल्यानंतर तयार झालेला प्रचंड धूर इमारतीत कोंडला गेला आणि गुदमरल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. या दुर्घटनेत इमारतीचे बांधकाम आणि सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाले आहे का, याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नेमकी काय घडली घटना? ५ महत्त्वाचे मोठे अपडेट्स:
सोमवारी दुपारी घडलेल्या या भीषण दुर्घटनेचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:
- १५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी: अलीगंजमधील उषा मेहता मार्गावर असलेल्या या तीन मजली इमारतीमध्ये दुपारी 3 च्या सुमारास आग लागली. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लासेस सुरू होते, जिथे विद्यार्थी शिकत होते. किंग जॉर्जेस मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (KGMU) ट्रॉमा सेंटरमध्ये एकूण 22 लोकांना आणण्यात आले होते, ज्यापैकी 15 जणांना मृत घोषित करण्यात आले. इतर जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
- जीव वाचवण्यासाठी वरून मारल्या उड्या: आग एवढ्या वेगाने पसरली की विद्यार्थ्यांना बाहेर पडायला जागा उरली नाही. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये अग्निशामक दलाचे जवान लोकांना खिडकीतून खाली उतरवताना दिसत आहेत. काही विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून थेट खाली उड्या मारल्या, ज्यामुळे त्यांच्या पाठीला गंभीर दुखापती झाल्या आहेत.
- बचावकार्यासाठी मोठी यंत्रणा: आग विझवण्यासाठी आणि अडकलेल्या निष्पापांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या तब्बल 19 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यासोबतच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठे बचावकार्य राबवले.
- ४ जणांना अटक आणि ४ अधिकारी निलंबित: या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत राम कृष्ण उपाध्याय, वीरेंद्र प्रसाद शुक्ला, तुशोक कृष्ण जयस्वाल आणि सुरेश कुमार साहू या 4 जणांना अटक केली आहे. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल 4 बड्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
- आर्थिक मदतीची घोषणा: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी 2 सदस्यीय विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (PMNRF) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









