Nasrapur Case : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि तिच्या निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. या अत्यंत संवेदनशील खटल्यात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने गुरुवारी (२५ जून) महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५ वर्षे) याला दोषी ठरवले आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात विक्रमी वेळेत न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते, ज्याची दखल घेत जलदगती न्यायालयाने या खटल्याची सुनावणी अत्यंत वेगाने पूर्ण केली. न्यायालयाने आरोपीवरील सर्वच्या सर्व गुन्हे सिद्ध मानले आहेत. यामध्ये दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये थेट फाशीच्या (मृत्यूदंड) शिक्षेची तरतूद असून, उर्वरित कलमांनुसार आजन्म जन्मठेप आणि १४ वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
“६५ वर्षांचा वृद्ध इतका क्रूर गुन्हा कसा करेल?” – बचाव पक्षाचा युक्तिवाद
न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये अंतिम शिक्षेवर जोरदार युक्तिवाद झाला. गुन्हा सिद्ध झाल्यानंतरही आरोपीच्या वकिलांनी भीमराव कांबळेच्या बचावासाठी केविलवाणा प्रयत्न केला. बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, “गुन्ह्यातील घटनांची परस्पर सांगड योग्य प्रकारे लागत नाही. तसेच, आरोपी स्वतः या घटनेमुळे प्रचंड मानसिक धक्क्यात असल्याचे दिसून येत आहे.”
आरोपीचे वय ६५ वर्षे असल्याचे सांगत वकिलांनी युक्तिवाद केला की, “तो एक वृद्ध असून वयाच्या या टप्प्यावर तो इतका क्रूर आणि अमानुष गुन्हा करू शकतो का?” त्यामुळे या वयाचा विचार करून त्याला फाशी ऐवजी केवळ जन्मठेपेचीच शिक्षा देण्यात यावी, जी त्याच्यासाठी योग्य राहील, असा दावा बचाव पक्षाने केला.
न्यायालयाचे अत्यंत तीव्र ताशेरे: “चेहऱ्यावर भीती नाही, असा व्यक्ती समाजासाठी घातक”
बचाव पक्षाचा हा युक्तिवाद आणि आरोपीची वागणूक पाहता विशेष न्यायमूर्तींनी आपल्या निकालपत्रात अत्यंत कठोर निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने स्पष्ट केले की, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आणि निकालपत्राचे वाचन सुरू असतानाही आरोपी भीमराव कांबळेच्या चेहऱ्यावर भीतीची एक रेषही उमटली नाही. त्याच्या संपूर्ण देहबोलीवरून (बॉडी लँग्वेज) त्याला आपल्या कृत्याचा तीळमात्रही पश्चात्ताप झाल्याचे जाणवत नव्हते. तो न्यायालयात अत्यंत सामान्यपणे वागत होता. अशा प्रकारची अघोरी कृत्य करणारा आणि मनात कोणतीही टोचणी किंवा पश्चात्ताप नसलेला व्यक्ती हा समाजासाठी अत्यंत घातक आणि असुरक्षित आहे, असे न्यायालयाने गंभीरपणे नमूद केले.
कुटुंबाने आणि समाजाने नाकारले अस्तित्व; वैद्यकीय अहवालात ‘फिट’
या खटल्यातील एक अत्यंत हृदयद्रावक आणि सामाजिक वास्तव म्हणजे, आरोपी भीमराव कांबळे हा इतका घृणास्पद ठरला आहे की, त्याच्या स्वतःच्या ७ मुली, मुलगा आणि पत्नी यांपैकी एकही जण त्याला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्याची बाजू घेण्यासाठी न्यायालयात उपस्थित राहिले नाही. यापूर्वी दोन वेळा गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही त्याला सुधारण्याची संधी मिळाली होती, मात्र तो न सुधारल्यामुळे समाजाने आणि त्याच्या स्वतःच्या कुटुंबाने त्याचे अस्तित्व पूर्णपणे नाकारले आहे.
तसेच, आरोपीच्या वयाचा गैरफायदा घेण्याचा बचाव पक्षाचा प्रयत्न न्यायालयाने वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे हाणून पाडला. आरोपीची झालेली ‘पोटन्सी टेस्ट’ (पुरुषत्व चाचणी) आणि ‘मेंटल हेल्थ टेस्ट’ (मानसिक आरोग्य चाचणी) यांचे अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आले आहेत. तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असून लैंगिक कृत्य करण्यास पूर्णपणे सक्षम आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाल्यामुळे त्याच्यावर वयाचा दाखला देऊन कोणतीही दया दाखवता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
“आता तू जे सांगतोस तो इतिहास झाला”; न्यायाधीशांनी आरोपीला खडसावले
सुनावणी दरम्यान न्यायालयाने आरोपीला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. त्यानंतर जेव्हा न्यायमूर्तींनी त्याला विचारले की, “१ मे रोजी घडलेली ती घटना तुला आठवते का? तुला त्याबद्दल पश्चात्ताप होतो का?” तेव्हा सुरुवातीला आरोपी कोर्टात पूर्णपणे गप्प राहिला आणि त्याने मौन बाळगले.
न्यायाधीशांनी पुन्हा विचारणा केली असता, त्याने नेहमीप्रमाणे खोटा बनाव रचत म्हटले की, “मी हे कृत्य केलेच नाही. मी त्या मुलीला काठीशेव खायला देण्यासाठी घेऊन जात होतो, पण अचानक माझा पाय घसरल्यामुळे मी पडलो आणि त्यातच त्या मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागला.”
आरोपीचा हा खोटा दावा खोडून काढत न्यायाधीशांनी त्याला कडक शब्दांत खडसावले की, “तू आता स्वतःचा कोणताही बचाव करू शकत नाहीस, कारण तो अधिकार आता संपला आहे. तू जे सांगत आहेस तो आता इतिहास झालाय; वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तुझ्यावरचा गुन्हा आता पूर्णपणे सिद्ध झाला आहे. आता तूच सांग, तुला कोणती शिक्षा देण्यात यावी?” या थेट प्रश्नावर नराधम कांबळे पूर्णपणे निरुत्तर झाला आणि गप्प बसला. त्यानंतर न्यायालयाने त्याला खाली बसण्यास सांगितले.









