Uday Kotak warning on fuel prices and economy: जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाचे परिणाम आता भारतामध्ये लवकरच दिसू लागतील, असा इशारा दिग्गज बँकर आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी दिला आहे.
पश्चिम आशियातील अस्थिरतेमुळे इंधनाचे दर वाढण्याची दाट शक्यता असून, याचा थेट फटका भारतीय ग्राहकांच्या खिशाला बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
“धक्का अजून बसलेला नाही, पण तो येतोय”
सीआयआय (CII) वार्षिक परिषदेत बोलताना उदय कोटक म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम अद्याप इंधनाच्या किमतींवर पूर्णपणे झालेला नाही. “अजून आपल्याला ऊर्जा संकटाचा खरा फटका बसलेला नाही, पण तो लवकरच बसेल आणि तो खूप मोठा असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कंपन्यांकडे सध्या असलेला जुना साठा संपल्यानंतर नवीन महागड्या दराने तेल खरेदी करावे लागेल, तेव्हा सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागेल.
सामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम
इंधनाचे दर वाढले की केवळ पेट्रोल-डिझेल महाग होत नाही, तर वाहतूक खर्च वाढल्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूही महाग होतात. कोटक यांच्या मते, ज्या कुटुंबांचे उत्पन्न मर्यादित आहे, त्यांना या वाढत्या महागाईचा सामना करणे कठीण जाईल. कच्च्या तेलाचे दर 60 डॉलर प्रति बॅरल असताना आपली अर्थव्यवस्था स्थिर असते, परंतु हेच दर 100 डॉलरच्या जवळ पोहोचले की रुपया आणि महागाईवर मोठा ताण येतो. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो, हीच भारताची सर्वात मोठी कमकुवत बाजू आहे.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचत करणे, अनावश्यक परदेशी सहली टाळणे आणि सोने खरेदी लांबणीवर टाकण्याचे आवाहन केले होते. उदय कोटक यांनी या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. “संकटकाळात देशाने आपल्या मर्यादेत राहून खर्च करणे आवश्यक आहे. अनावश्यक उपभोग कमी करणे हाच आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग आहे,” असे कोटक यांनी सुचवले.
जागतिक स्तरावर देश आता अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेत आहेत, अशा काळात भारताने ‘कम्फर्ट झोन’ मधून बाहेर पडून वाईट परिस्थितीसाठी आधीच तयारी (Paranoia) करणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी आवर्जून सांगितले.
हे देखील वाचा – NEET-UG 2026 Re-exam Date: पेपरफुटीच्या आरोपानंतर NEET परीक्षा पुन्हा कधी होणार? NTA ने दिली माहिती










