Asaduddin Owaisi : नाशिक येथील बहुचर्चित धर्मांतर प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता या वादात ‘एमआयएम’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेतली आहे. शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ओवेसी यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिची जोरदार पाठराखण केली. हे संपूर्ण प्रकरण द्वेष भावनेतून रचलेले असून, सुशिक्षित मुस्लीम तरुण-तरुणींना विनाकारण त्रास देण्यासाठी हा बनाव रचण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला.
न्यायालयावर विश्वास, ‘मीडिया ट्रायल’चा निषेध-
असदुद्दीन ओवेसी यांनी निदा खानच्या अटकेवर आणि त्यानंतर सुरू असलेल्या चर्चेवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, “केवळ आरोप झाले म्हणून एखाद्या मुलीला गुन्हेगार ठरवणे चुकीचे आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर ‘मीडिया ट्रायल’ सुरू असून, तिला आधीच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. निदा खान निर्दोष आहे आणि न्यायालय तिला नक्कीच न्याय देईल.” या प्रकरणातील तक्रार सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने दाखल केली असल्याकडे लक्ष वेधून, त्यांनी यामागे राजकीय हेतू असल्याचे संकेत दिले.
वस्तूंच्या जप्तीवरून ओवेसींचा खोचक सवाल-
पोलिसांनी निदा खानच्या घरातून जप्त केलेल्या वस्तूंवरून ओवेसी यांनी प्रशासनाला धारेवर धरले. “एखाद्या व्यक्तीच्या घरात बुरखा, नकाब किंवा धार्मिक ग्रंथ सापडणे, हा गुन्हा कधीपासून झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात त्यांनी दिल्ली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयातील जुन्या प्रकरणांचा दाखला दिला, जिथे केवळ उर्दू साहित्यावरून झालेल्या अटकेनंतर न्यायालयाने पोलिसांना फटकारले होते. “बुरखा किंवा धार्मिक पुस्तक ही काही आक्षेपार्ह वस्तू नाही, मग त्यावरून गुन्हेगारी शिक्कामोर्तब कसे केले जाऊ शकते?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
कंपनीच्या निवेदानाचा दाखला आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’चे खंडन-
ओवेसी यांनी टीसीएस (TCS) कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनाचा संदर्भ देत पोलिसांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “संबंधित मुलगी एचआर विभागात कार्यरत नव्हती आणि तिची बदली झाली असल्याने तिचा कंपनीशी थेट संबंध उरला नव्हता. अशा परिस्थितीत तिला मुख्य सूत्रधार ठरवणे तर्कहीन आहे,” असे त्यांनी नमूद केले. मुस्लीम समुदायातील उच्चशिक्षित पिढीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही सर्व कारवाई केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.












