Mumbai Local : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सातत्याने कोसळत आहे. या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. धावत्या लोकलमध्ये केवळ दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर एका तरुणाच्या हत्येत झाले आहे.
अंधेरी ते बोरिवली दरम्यान लोकलमध्ये रक्तरंजित थरार
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान ही धक्कादायक घटना घडली. पश्चिम रेल्वेच्या एका लोकल ट्रेनमधील प्रथम श्रेणीच्या (फर्स्ट क्लास) डब्यातून काही प्रवासी प्रवास करत होते. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे डब्यात पाणी येऊ नये, यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. एका प्रवाशाने दुसऱ्याला लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितले. मात्र, या साध्या संवादाचे रूपांतर पाहता पाहता उग्र वादात झाले.
किरकोळ वादातून धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला
दोन्ही प्रवाशांमधील हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यातील एका आरोपीने रागाच्या भरात आपल्या जवळील धारधार शस्त्र काढले आणि समोरच्या व्यक्तीवर सपासप वार केले. या प्राणघातक आणि भीषण हल्ल्यात मयंक लोहार नावाचा तरुण गंभीररित्या जखमी झाला. डब्यातील इतर प्रवासी काही समजून घेण्याच्या आतच हा रक्ताचा थरार घडला.
रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
रात्रीच्या वेळी प्रथम श्रेणीच्या डब्यात घडलेल्या या थरारक घटनेमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत प्रवाशांची मानसिकता बिघडली आहे का, असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहे.










