Eknath Shinde – शिवसेना शिंदे गटाचा 60 वा वर्धापन दिन सोहळा गोरेगाव येथील भव्य ‘नेस्को सेंटर’ येथे पार पडला. या सोहळ्याला उबाठातून फुटलेले सहा खासदार उपस्थित राहाणार का, याबद्दल मोठी उत्सुकता होती. परंतु या खासदारांपैकी कुणीही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. या सोहळ्यात भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘ऑपरेशन टायगर’वरून उबाठाला इशारा देत म्हणाले की, यह तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आगे आगे देखो होता है क्या?
स्वतःला टायगर संबोधत एकनाथ शिंदे म्हणाले की, बर्याच जणांच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत. एकनाथ शिंदे काय बोलणार? व्यासपीठावर कोण-कोण येणार? काय होणार? अरे, आज यह टायगर आपके सामने खडा है. मी बघतो आहे की, काल-परवापासून कुछ कुत्ते रोज भौंक रहे है, पण कुत्ते झुंड में आकर भौंकते है, शेर अकेला आता है. कुत्ते भौंकते रहते है, टायगर दहाडता और शिकार करता रहता है. ही शिवसेना आहे. आम्ही धर्मवीरांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत.
आपल्या भाषणातून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, केवळ नावात बाळासाहेब असून चालत नाही. तर तुमच्या मनात, विचारात आणि कामात असावे लागतात. हे बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. ते आम्ही आवडत्या उपक्रमांनी साजरे करणार आहोत. रक्ताचे नाते सांगून, सातबारावर आपले नाव लावून कुणाला वारस होता येत नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही. शिवसेना म्हणजे विचारांचा आणि आमच्या-तुमच्या काळजाचा तुकडा आहे. शिवसेना राजकीय पक्ष नाही, तर भगवे वादळ आहे. जो भगव्याला विसरला, तो राजकारणातून संपला, हे आपण पाहिलेले आहे. खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व सोडले. बाळासाहेबांच्या हयातीत तर त्यांना त्रास दिला, पण त्यांच्या जाण्यानंतरदेखील बाळासाहेबांना ज्यांचा तिरस्कार होता, त्यांचा पुरस्कार तुम्ही करत आहात. ही तुमची वारसदारी. ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचे काम केले. जिवापाड शिवसेनेवर प्रेम केले. आज महाराष्ट्रात बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम केले, त्यांना तुम्ही शिव्या देत आहात. हा कुठला न्याय? शिवसेना पहिल्यांदा कुणी फोडली? राष्ट्रवादीने. दुसर्यांदा कुणी फोडली? काँग्रेसने. त्यांच्यासाठी ओव्या गात आहेत. ज्यांनी गहाण टाकलेला धनुष्यबाण सोडवला, शिवसेनेचा विचार पुढे नेण्याचे काम केले, त्यांना तुम्ही शिव्या देत आहात.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही चार वर्षांपूर्वी उठाव केला. आपला उठाव सुपरहिट झाला. महाराष्ट्रातील जनतेने तो स्वीकारला. आपल्या मागे बाळासाहेब आणि दिघेसाहेबांचा आशीर्वाद होता. म्हणून जनतेच्या न्यायालयात जिंकलो. लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या भावांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी होते. आपण उठाव केल्यानंतर ते लोक म्हणाले, कुणी सोबत राहणार नाही. कुणी निवडून येणार नाही. पण मी पहिल्या भाषणात सांगितले होते, एक जरी आमदार निवडून आला नाही, तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून गावाला शेती करायला निघून जाईल. 40 आमदार होते, एकनाथ शिंदेने 60 आमदार निवडून आणले. आपल्याकडे आमदार आणि खासदार होतेच. आता 60 नगराध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, सभापती, महापालिकांचे महापौर आहेत. सगळीकडे शिवसेनेचे वादळ घोंगावते आहे. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतो आहे.
चांदा ते बांदा शिवसेनामय करून टाकण्याचे काम माझ्या शिवसैनिकांनी केले याचा मला अभिमान आहे. विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध आल्या आहेत. उरलेल्या 11 जागा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांचे खातेदेखील उघडणार नाही. आपण बिनविरोध जिंकल्यावरही आपल्यावर आरोप केले. तुमचे उमेदवार टिकले नाही, पळून गेले. त्याला आम्ही काय करणार? हा महायुतीचा विजय आहे. काही लोक म्हणाले की, लांडग्यांचे ऑपरेशन करतो. पण तो तर कम्पाउंडर आहे. तो कसा ऑपरेशन करणार? इथे श्रीकांत शिंदे खरा डॉक्टर आहे. पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते. लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. 4 वर्षांपूर्वी याच लांडग्यांनी धमक्या दिल्या होत्या. मुंबईत यावेच लागेल.
वरळीतून जावेच लागेल. मुंबई कुणाची जहांगीर आहे का? एकनाथ शिंदे एकटा आला. गाडीमध्ये बसला. बायरोड वरळीत येऊन थांबला. तेव्हा धमक्या देणारे घरात बसून ऑनलाईन बघत होते. तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार? आता काय तर ऑपरेशन तुडवा. हिंमत असेल तर समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का?










